राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे विधान
मुंबई : देशात एकीकडे हैद्राबाद बलात्कारानंतर महिला अत्याचारावरील प्रश्नांना वाचा फुटली आहे तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी करण्यासाठी सल्ला दिला आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे बलात्कार रोखता येतील, असा सल्ला कोश्यारी यांनी दिला आहे. नागपूर विद्यापीठातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी संस्कृतचे श्लोक शिकवले पाहिजेत, असे ते म्हणाले.
नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज ऍडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवण्यात येतील, यावर आपले मत व्यक्त केली. एक अशी वेळ होती, ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केले जात होते. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडून बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असेही ते म्हणाले.
यावेळी कोश्यारी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा वापर-गैरवापर, सत्ता आणि पैसा अशा विषयांवर मार्गदर्शनही केले. यापूर्वी खासदार गणेश सिंग यांनीदेखील संस्कृतबाबत वक्तव्य केले होते. अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनानुसार नियमितपणे संस्कृत बोलल्यास मज्जासंस्थेस चालना मिळते. तसेच यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो असा दावा सिंग यांनी केला होता.
जर संगणक प्रोग्रामिंग संस्कृतमध्ये केले गेले तर ते सध्याच्या प्रणालीपेक्षा अधिक परिणामकारक आणि कार्यक्षम ठरेल, असे अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्था नासाने केलेल्या कथित संशोधनाचा हवाला देत त्यांनी सांगितले होते. तसेच देशातील 97 टक्के भाषा या संस्कृतवर आधारित आहेत आणि त्यामध्ये काही इस्लामिक भाषांचाही समावेश होतो. या भाषांचे मूळ हे संस्कृतमध्येच आहे, असेही ते म्हणाले होते.