नवी दिल्ली , वृत्तसंस्था :अनेक परप्रांतीय तरुण रोजगारासाठी महाराष्ट्रात येतात. आता भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहले आहे. हे पत्र विशेष आहे. कारण या पत्रात कृपाशंकर सिंह यांनी उत्तर प्रदेशातील शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची विनंती केली आहे.
उत्तर प्रदेशातही तरुणांना मराठी भाषा येत असेल तर त्यांना मराठीमध्ये सरकारी नोकरी मिळणे सोपे होईल. असे देखील आपल्या पत्रामध्ये नमूद केले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या पत्राची उत्तर प्रदेश सरकार दखल घेण्याची शक्यता आहे. कारण यासंदर्भांतल्या सूचना योगी आदित्यनाथ यांच्याकडे विचाराधीन आहेत. वाराणसी येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबवण्यात येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून कृपाशंकर सिंह यांनी केलेली सूचना विचाराधीन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत असल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
कृपाशंकर हे जवळपास ५० वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणानुसार आणि अनुभवानुसार अनेक तरुण तरुणी उच्चशिक्षण , नोकरीच्या करणामुळे महाराष्ट्रात येतात . मात्र त्यांना मराठी भाषा अवगत नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळेच कृपाशंकर यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मराठी भाषा शिकवण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.