मुंबई – टीसीएस ही भारतातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर निर्यात करणारी कंपनी आहे. आता या कंपनीने जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी बनण्याची महत्त्वकांक्षा बाळगली आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गोपीनाथन यांनी ही माहिती एका परिसंवादात बोलताना दिली.टीसीएस फारच बलाढ्य कंपनी आहे आणि आता ही कंपनी आणखी मोठी होण्यास वाव राहिला नाही असे काही विश्लेषकांना वाटते. कारण महसूल 25 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे.
तर कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सहा लाखाच्या पुढे गेली आहे. त्यामुळे आता ही कंपनी वाढण्यास मर्यादित वाव असल्याचे बोलले जाते.मात्र गोपीनाथन यांनी सांगितले की, टीसीएस कंपनीची वाढ खुंटलेली नाही किंवा खुंटणार नाही. आमचा महसूल दुपटीने तिपटीने किंवा चार पटीने वाढू शकतो. मात्र यासाठी किती कालावधी लागेल हे स्पष्ट करण्यास गोपीनाथन यांनी नकार दिला.
ते म्हणाले की आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर विमा, बॅंकिंग सेवाबरोबरच इतर परंपरागत उद्योगातही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
या उद्योगाच्या गरजा कशा भागवायच्या याबाबत आमचे संशोधन आणि विकास चालू असतो. त्यामुळे आगामी काळात विविध क्षेत्रात आमची उत्पादने स्वीकारली जातील याबाबत आम्हाला आत्मविश्वास आहे.नव्या तंत्रज्ञानाचा वापर कर्मचाऱ्यांना करता आला पाहिजे यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी निरंतर प्रयत्न करीत असतो. 2001 मध्ये आम्ही जगातील दहा मोठ्या कंपन्यात येण्याचा प्रयत्न करण्याचे ठरविले होते.वेळापत्रकाप्रमाणे आमचे काम आता पूर्ण झाले आहे.