नवी दिल्ली – चलन बाजारातील अस्थिरता आणि कच्चा माल माल महागल्याचे कारण सांगून बहुतांश कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या दरात वाढ जाहीर केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून होणार आहे. त्यामुळे नवे वर्ष महाग वाहनांचे ठरणार आहे.
आता बहुतांश कार कंपन्यांनी उत्सर्जनाच्या नव्या मानदंडाची अंमलबजावणी सुरू केली आहे. या यंत्रसामुग्रीच्या विकसनासाठी कंपन्यांना बरीच गुंतवणूक करावी लागली होती. ही गुंतवणूक परत मिळविण्यासाठी कंपन्या वाहनांचे दर वाढविणार हात्या. दरम्यानच्या काळात दरवाढ टाळण्यासाठी कंपन्यांनी सरकारकडे वाहनावरील जीएसटी कमी करण्याची सूचना केली होती.
मात्र महसुलात तूट निर्माण झाल्यामुळे अर्थमंत्रालयाने जीएसटी कमी करण्याची शक्यता नाकारली होती. त्यानंतर कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे. या आठवड्यात निस्सान कंपनीने आपल्या विविध वाहनांच्या दरात पाच टक्क्यांपर्यंत वाढ जाहीर केली आहे. निस्सान मोटार इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, जमाखर्चाचे तोंडमिळवणी करण्यासाठी आम्हाला ही दरवाढ करावी लागत आहे.
टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत जानेवारी महिन्यापासून वाढ केली आहे. विविध मॉडेलच्या दरात वेगवेगळी वाढ असेल असे कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. महिंद्रा कंपनीने ट्रॅक्टरसह आपल्या प्रवाशी आणि व्यवसायिक वाहनांच्या दरात एक जानेवारीपासून वाढ जाहीर केली आहे. याचा तपशील वितरकाकडे पाठविण्यात आला आहे. ही दरवाढ तीन टक्क्यांपर्यंत असू शकते असे समजले जाते.
फोक्सवॅगन कंपनीने आपल्या काही वाहनांच्या दरात 2.5 टक्क्यापर्यंत वाढ जाहीर केली आहे. कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जमा खर्चाचर तोंडमिळवणी करण्यासाठी ही दरवाढ आवश्यक होती. भारतातील सर्वात मोठी प्रवासी वाहन उत्पादक कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियाने डिसेंबरच्या सुरुवातीलाच दरवाढ जाहीर केलेली आहे.