नवी दिल्ली – वादग्रस्त बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या भारतातील रहिवासी परमिटला वर्षभराची मुदत मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. तस्लिमा नसरीन यांनी स्वीडनचे नागरिकत्व स्वीकारले आहे. 2004 पासून त्यांनी सातत्याने भारतातील रहिवासाचे परमिट मिळवले आहे. आता जुलै 2020 पर्यंत त्यांना भारतात रहाण्याचे परमिट मिळाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तस्लिमा नसरीन यांना गेल्या आठवड्यात तीन महिन्यांच्या रहिवाशाचे परमिट मिळाले होते. ही मुदत वर्षभरापर्यंत वाढवण्यात यावी, अशी विनंती नसरीन यांनी ट्विटरवरून गृहमंत्री अमित शहा यांना केली होती. आपण 5 वर्षांच्या परमिटसाठी अर्ज केला होता. मात्र आपल्याला दरवेळी केवळ वर्षभराची मुदतवाढ मिळाली आहे.
आपल्याला 50 वर्षे राहण्याची मुदतवाढ मिळेल, असे आश्वासन माजी गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले होते. भारत हे माझे घरच असल्याने मुदतवाढीबाबत फेरविचार व्हावा, असे नसरीन म्हणाल्या होत्या. आपल्या रहिवासी परमिटला मुदतवाढ मिळाल्याबद्दल त्यांनी आणखी एक ट्विट करून गृहमंत्रालयाचे आभारही मानले आहेत.
गेल्या दशकभरात नसरीन अमेरिका आणि युरोपातही राहिल्या आहेत. मात्र भारता विशेषतः कोलकातामध्येच कायम वास्तव्य करण्याची ईच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांना कायम रहिवासी परमिट देण्याबाबत गृहमंत्रालयाकडून अद्याप काहीही निर्णय झालेला नाही.