भाग्यश्री कोलते हिच्या रूपाने महाराष्ट्राला एक देदीप्यमान तिरंदाज खेळाडू गवसली आहे. अत्यंत कमी काळात तिने या खेळात अपला दबदबा निर्माण केला आहे. श्री शिवछत्रपती पुरस्कार मिळवित तिने राज्य पातळीवरील सर्व खेळाडूंना मागे टाकले व आपला वरचष्मा सिद्ध केला आहे. आज करोनाच्या धोक्यामुळे तसेच विवाह झाल्याने तिने स्पर्धांमधून काही काळ ब्रेक घेतला होता. मात्र, आता नव्या जोशात पुनरागमन करण्यासाठी ती सज्ज बनली आहे.
औरंगाबादजवळील नेवासा माध्यमिक शाळेकडून 2009 मध्ये पाचव्या इयत्तेत असताना तिने या खेळाचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यावेळी अभिजित दळवी हे तिचे प्रशिक्षक होते. मैदानावर केवळ मोठ्या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी ती जात होती त्यावेळी दळवी सरांनीच तिला नुसता खेळ काय पाहते तू पण हा खेळ सुरू कर, असे सांगितले व तिने सराव सुरू केला. तसे त्यापूर्वीच ती क्रिकेट, कबड्डी व खो-खो खेळायची पण जशी तिला तिरंदाजीची गोडी लागली तसे हे खेळ मागे पडले व ती या खेळाशी एकरूप झाली.
तिरंदाजी खेळाला सुरुवात केल्यानंतर प्रथम तिने जिल्हा, झेडपी स्तरावरील सामन्यांत सहभाग घेतला. यावेळी तिची कामगिरी तशी फारशी सरस झाली नाही मात्र अनुभवाची शिदोरी तिला निश्चितच मिळाली. 3 एप्रिल 1998 मध्ये जन्मलेल्या भाग्यश्रीने त्यानंतर सबज्युनिअर गटाच्या स्पर्धेत खेळायला सुरुवात केली व तिथेच तिने पहिले पदक मिळविले. 2010 मध्ये झालेल्या या स्पर्धेत तिने गोल्ड मेडल प्राप्त केले व तेथूनच तिची घोडदौड सुरू झाली. लोणीकंद येथील शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली भाग्यश्री घरात, शेतात मदत करतानाच खेळातही यशस्वी होत आहे.
आठवीला असताना सबज्युनिअर गटाच्या
स्पर्धेत तिने पहिले राज्यस्तरीय गोल्ड मेडल मिळविले व त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. रणजीत चामले या ख्यातनाम प्रशिक्षकांकडे ती शाहू महाविद्यालयाच्या मैदानावर आता वरिष्ठ पातळीवरचा सराव करते आहे. सबज्युनिअर, जिल्हा, विभागीय तसेच राष्ट्रीय अशा एकेक स्तरावर तिने पदकांची रास ओतली आहे. त्याचबरोबर सांघिक गटातही तिच्यामुळेच राज्याला विविध स्पर्धेत पंचवीस पदके मिळाली आहेत.
शेती करत असल्यामुळे तिची शारीरिक तंदुरुस्ती कमालीची असून एकीकडे शेतीची कामे व दुसरीकडे खेळाचा सराव असा दुहेरी संगम ती यशस्वीरीत्या सांभाळत आहे. वडिलांना शेतीच्या कामात मदत करताना दूध काढणे ते पोहोचविणे अशी कामेदेखील तिला करावी लागतात. एकतर लोणीकंद म्हणजेच खूप दूर राहात असल्यामुळे तिला सातत्याने सरावसत्रात देखील सहभागी होताना कसरत करावी लागते. मात्र, तिचे प्रशिक्षक तिला याबाबत सर्व सहकार्य करतात. जागतिक विद्यापीठ पातळीवर तिने गेल्या वर्षी प्रथमच सहभागी होताना चौथे स्थान मिळविले, अशी कामगिरी करणारी ती पहिलीच खेळाडू ठरली.
एकदा सराव करताना तिच्या हाताच्या स्नायूंना दुखापत झाली. लगेचच तिला शस्त्रक्रिया करावी लागली. शिवाय खांद्याला देखील दुखापत झाली. अशा दोन दुखापतींवर मात करत तिने पुन्हा गरूडभरारी घेतली. डॉक्टरांनी तिला पाच महिने विश्रांतीला सल्ला दिला होता. विश्रांती घेऊन बरी झाल्यावर तिने लगेचच राष्ट्रीय स्तरावर गोल्ड मेडल मिळविले व आपला दबदबा प्रस्थापित केला. राज्य व विभागीय अशा 30 स्पर्धा खेळताना तिने पहिली रॅंक सातत्याने कायम राखली. आजवर तिने 160 पदके मिळविली असून त्यात राष्ट्रीय पातळीवरील 50 पदकांचा समावेश आहे, हेच तिचे कर्तृत्व आहे. या कामगिरीच्या जवळपास देखील कोणी खेळाडू पोहोचलेला नाही. चायनीज तैपैईला झालेल्या स्पर्धेत तिने सहभागी होत पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव घेतला. यावेळी तिला जरी पदक मिळाले नसले तरी पुढील वाटचालीसाठी मोलाचा अनुभव मिळाला.
तिच्या घरच्यांसाठी तर ती एक मुलगी नसून मुलगाच आहे असे तिचे वडील अभिमानाने सांगतात. तिच्या दुखापतीच्या वेळी तिच्या घरच्यांना आता काय करावे, असा प्रश्न पडला होता. मात्र, चामले सरांनी तिची व्यवस्थित काळजी घेतली. फिजिओ व देखभाल केली व तिला दुखापतीतून सावरायला मदत केली. चामले सरांची अकादमी आज देशातील सर्वोत्तम पाच अकादमींमध्ये गणली जाते. याच अकादमीत भाग्यश्री सराव करते व सातत्याने नवनवे यश मिळविते.
ती मेहनती व जिद्दी खेळाडू असून खूप लहान वयातच तिने हे यश संपादन केले असले तरी तिचे पाय जमिनीवर घट्ट आहेत. यशाचे वारे तिला लागलेले नाही. भारतीय संघात येत्या काळात तिची निवड होईल अशीच तिची कामगिरी आहे. तिला लक्ष्य संस्था तसेच राज्य शासनाने मदत केली असली तरी ती पुरेशी नाही. अजून खूप मदत झाली पाहिजे, असे तिचे प्रशिक्षक चामले सांगतात. असो, तिरंदाजीतील एक हौशी खेळाडू ते राष्ट्रीय पदक विजेती असा प्रवास करणारी भाग्यश्री येत्या काळात भारतीय संघाकडून खेळतानाही आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपला दबदबा निर्माण करेल असा ठाम विश्वास वाटतो.
– अमित डोंगरे