डॉ. मेघश्री दळवी
चंद्रावर जायला आता अनेक देश उत्सुक आहेत. भारत, चीन आणि यांच्या जोडीने इस्रायल. यावर्षी 22 फेब्रुवारी 2019 रोजी स्पेस-एक्सचं रॉकेट वापरून इस्रायलच्या खासगी यानाने, बेरशीटने उड्डाण केलं. बेरशीट 11 एप्रिलला चंद्रावर उतरणार होतं. मात्र लॅंडींग करताना ते अखेरच्या क्षणी जोराने आदळलं. लॅंडींग नीट न झाल्याने त्याच्यातील उपकरणांचं नुकसान झालं. बेरशीटच्या बातमीने अख्खं जग हळहळलं. आता हळूहळू या मोहिमेची अधिक माहिती हाती येत आहे आणि अलीकडेच एक धक्कादायक बाब पुढे आली आहे- चंद्रावर टार्डीग्रेड्स असल्याची!
टार्डीग्रेड हा एक अजब प्राणी आहे. म्हटलं तर आहे अगदी सूक्ष्म, जेमतेम एक मिलीमीटर लांबीचा. पण कमालीचा चिवट. तुम्ही त्याला अत्यंत कमी तापमानात ठेवा, की अतिशय उष्ण वातावरणात ठेवा. त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून शुष्क करून टाका, की त्याच्यावर अतिशय घातक अशा किरणोत्साराचा मारा करा. हा अजब प्राणी सगळ्या प्रतिकूल परिस्थितीतही जिवंत राहतो. त्याची जीवइच्छा इतकी प्रबळ आहे, की या विचित्र परिस्थितीत तो वर्षानुवर्ष टिकून राहू शकतो.
शास्त्रज्ञांसाठी टार्डीग्रेड एक आव्हान आहे. तो स्वत:ला कसा टिकवून ठेवतो हे आपण समजू शकलो तर त्याचा वापर आज ना उद्या आपण निश्चितच करू शकतो. श्वसन किंवा चयापचयासारख्या शारीरिक क्रिया टार्डीग्रेड जवळजवळ एक शतांश टक्के इतक्या खालच्या दराला आणू शकतो. कमालीच्या हायबरनेशनमध्ये म्हणजे निष्क्रिय स्थितीमध्ये जाऊन राहू शकतो. मग जगायला योग्य अशी परिस्थिती मिळाली, की तो नेहमीच्या स्थितीत येऊन सगळ्या शारीरिक क्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करतो.
नेमक्या याच कारणासाठी इस्रायलच्या बेरशीट मोहिमेत टार्डीग्रेड्सचा समावेश होता. त्यांच्यामधलं पाणी काढून टाकून, डीहायड्रेट करून अत्यंत शुष्क झालेले हे जीव ऍम्बर या पिवळट तैलस्फटिकात टाकून या मोहिमेत पाठवलेले होते. चंद्रावर वातावरण नसल्याने सूर्यप्रकाश थेट पृष्ठभागावर येतो. दिवसा म्हणूनच तिथे अतिउच्च तापमान असतं, तर रात्री नेमकं उलट अतिशीत. वातावरण नसल्याने रेडिएशन म्हणजे विकिरणांचा थेट मारा होत असतो. त्यात हे टार्डीग्रेड्स कसे टिकतात हा अभ्यास बेरशीट मोहिमेतल्या शास्त्रज्ञांना करायचा होता. आता बेरशीट यान मोडून पडलं असलं, तरी त्यातले हे टार्डीग्रेड्स निश्चितच जिवंत असतील असा कयास नुकताच या मोहिमेच्या प्रमुखांनी जाहीर केला.
मात्र, बेरशीट आदळलं तेव्हा हे टार्डीग्रेड्स इतस्तत: पसरले गेले असले तर? माणसाने चंद्रावर पाऊल टाकलं आणि पुढेही आणखी काही मोहिमा नेल्या. या सगळ्यांचा परिणाम म्हणून तिथे किंचित बदल झाले आहेत असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यात या टार्डीग्रेड्सची भर पडली तर? निष्क्रिय स्थितीतले का होईना, पण टार्डीग्रेड्ससारखे जीव माणसाने चंद्रावर नेले आहेत. याचा नक्की परिणाम काय होईल हे कदाचित कित्येक शतकांनी समजेल.