रेडा -इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तसेच जनावरांना हक्काचे पाणी वर्षभर पुरवण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी तलावासह इतर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळेच तरंगवाडी तलाव सध्या 60 टके भरला आहे. उर्वरित तलाव शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरून घेतला जाणार असल्याची ग्वाही इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी दिली.
तरंगवाडी तलावात जलपूजन भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील, तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, गोखळीचे सरपंच बापू पोळ, तुकाराम करे, बजरंग राऊत, नवनाथ डाके, नितीन गोपने, डॉ. दादाराम झगडे, दिलीप भोंग, महानवर गुरुजी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, परिसरातील शेतकऱ्यांनी तलावात पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होती, यानुसार पाणी सोडले आहे. आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची गरज नाही.
इंदापूर तालुक्यातील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने भरणे यांनी पाठपुरावा करून शेतीचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी यशस्वी पावले उचलली आहेत. त्यामुळे तालुक्यात पाण्यासाठी कोणालाही आंदोलन कधीही करावे लागणार नाही, अशी माहिती कोकाटे-पाटील यांनी दिली.