मुंबई – छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. जेठालाल, टप्पूसेना, डॉ. हाथी, बबिता जीं आणि मराठमोळा एकमेव सेक्रेटरी भिडे हे सर्वच पात्र गेले अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
दरम्यान, याच मालिकेतील ‘टप्पू आणि बबिता जीं’ची भूमिका साकारणारे राज अनादकत आणि मुनमुन दत्ता गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. दोघेही सध्या रिलेशनशिपमध्ये आहेत. ही बातमी जाणून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. आधी दोघांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, पण आता मुनमुन आणि राज यांनी आपले मौन सोडले आहे.
“आपल्या विनोदामुळे स्त्रियांना सातत्याने शरमेने मान खाली घालावी लागते, आज मला भारताची लेक असल्याची लाज वाटतेय” असा संताप मुनमुन दत्ता हिने सोशल मीडियावरुन व्यक्त केला आहे. तर आता मुनमुन पाठोपाठ राज अनादकतने सुद्धा आपलं मत व्यक्त केलं आहे.
काय लिहिले राजने? जाणून घ्या…
राज अनादकत याने लिहिले की, “जो कोणी माझ्याबद्दल काहीही लिहित आहे, फक्त या तुमच्या बनावट कथांचा माझ्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करा. माझे मत जाणून न घेता माझ्याबद्दल काहीही लिहित आहात. जे काही सर्जनशील लोक माझ्याबद्दल लिहित आहेत, त्यांनी त्यांची सर्जनशीलता इतरत्र दाखवावी. देव त्या लोकांना थोडीतरी समज दे.’ असं तो म्हणाला.
View this post on Instagram
काय आहे म्हणाली मुनमुन दत्ता…
“बातम्यांच्या नावाखाली आपल्या कल्पित कथांची राळ उडवत कोणत्याही व्यक्तीच्या खासगी आयुष्यात, तिच्या समंतीशिवाय डोकावण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिलाय? एखाद्या स्त्रीने नुकतंच आपलं प्रेम गमवलंय किंवा आपला मुलगा गमावलाय, तिच्या चेहऱ्यावरून तुम्ही कॅमेराही हटवत नाही, हे केवळ टीआरपीसाठी.
तुम्हाला हव्या तशा बातम्या देता आणि एखाद्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवता. अशा प्रकारे एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर तुम्ही या सगळ्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही ते करू शकत नसाल तर तुम्हाला स्वत: ची लाज वाटली पाहिजे”.
तर आपल्या दुसऱ्या पोस्ट ती म्हणते, “मी आपल्याकडून चांगल्या अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, कमेंट सेक्शनमधील लोकांच्या अश्लील कमेंट पाहिल्यानंतर, म्हणजे सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांनीही अशा प्रकारच्या कमेंट केल्यानंतर आपला समाज कसा मागे वाटचाल करतोय हे लक्षात येतंय. स्त्रीवर सातत्याने तिच्या वयावरुन आणि इतर गोष्टीवरुन प्रत्येकाकडून आपापल्या कुवतीनुसार कमेंट केल्या जातात.
आपल्या कमेंटवरुन एखाद्याला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय याची कुणाचाच चिंता नाही. एखाद्याचे 13 वर्षाचे करियर अवघ्या 13 मिनीटात धुळीस मिळवलं जातं. त्यामुळे एखादा व्यक्ती नैराश्यात गेला किंवा आपले जीवन संपवण्याचा विचार करत असेल तर तुम्ही थोडं थांबा आणि विचार करा की आपल्यामुळेच ही परिस्थिती ओढावली असेल का. आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय”.