नवी दिल्ली – अभिनेत्री तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांच्यावर सन 2013 मध्ये म्हणजे कॉंग्रेस सरकारच्या काळातही आयकराचे छापे पडले होते, पण त्यावेळी मात्र कोणी इतकी आगपाखड केलेली नव्हती असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. निर्मला सीतारामन यांनी वरील दोघांची नावे घेतली नाहींत पण त्यांचा रोख त्याच कारवाईच्या अनुषंगाने होता असे सांगितले जात आहे.
कोणत्याही व्यक्तिगत प्रकरणांतील छाप्यांवर मला काहींच बोलायचे नाहीं असे नमूद करीत त्यांनी म्हटले आहे की,पण नवीन छाप्यांबाबत जी नावे घेतली आहेत त्या व्यक्तींवर सन 2013 मध्ये पण छापे घातले गेले होते ही बाबही ध्यानात घ्यावी लागेल. त्या आज येथे महिला पत्रकारांच्या एका संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. सन 2013 साली त्यावेळी कोणी यावर बोलले नाही पण यावेळी मात्र यावर बराच खल होतो आहे असे त्या म्हणाल्या.
तापसी पन्नु आणि अनुराग कश्यप यांनी अलिकडच्या काळात मोदी सरकारवर सातत्याने सोशल मिडीयावर टीका केली होती.तसेच त्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही समर्थन दिले होते. त्यामुळेच त्यांच्यावर छापे टाकण्यात आले अशी टीका होत आहे. त्यावर अर्थमंत्र्यांनी वरील उत्तर दिले.