नगर – राज्यात उन्हाळ्याचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एप्रिल महिन्यात उन्हाळ्याने रेकॉर्ड मोडले त्यानंतर आता मे महिन्यातही लोक भीषण उन्हाळ्याचा अनुभव घेत आहेत. दिवसाच्या तापमानात मोठी वाढ होत आहे. या दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाई निर्माण होते. तसा हा अनुभव नेहमीचाच आहे.
यंदा मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यानंतरही राज्यात पाण्याची फारशी टंचाई जाणवलेली नाही. त्यामुळे या महिन्यात पाणी पुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या कमी होती. मात्र, आता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात टॅंकरने दीड शतक पार केले आहे.आजमितीस राज्यातील 213 गावे, 563 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना 187 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
यामध्ये नगर जिल्ह्यातील टॅंकरची संख्या आता 11 पर्यंत पोहोचली आहे. राज्यात सध्या तापमानात मोठी वाढ होत आहे. या दिवसात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण होते. ग्रामीण भागाला या संकटाचा जास्त फटका बसतो. उन्हाळ्यात येथे पाणी मिळत नाही. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.