कारखाना कार्यक्षेत्र फुलले : परिसरात ऊसतोड कामगार संसारासह दाखल
वाघळवाडी (वार्ताहर) – विधानसभा निवडणूक, परतीच्या पावसाने घातलेला धुमाकूळ अन् आता सत्ता स्थापनेचे फसलेले त्रांगडे या तिहेरी पेचामुळे गळित हंगाम चांगलाच लांबला. त्यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने सर्व निर्णय राज्यपाल घेत असून त्यांनी शुक्रवार (दि. 22) पासून गळित हंगामाला परवानगी दिली असल्याने सोमेश्वरनगर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखा कार्यस्थळावर ऊसतोड मजूर दाखल होत असल्याने कार्यक्षेत्र कामगारांनी फुलला आहे.
श्री सोमेश्वर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, त्यानंतर बीड, उस्मानाबाद, जालना, अहमदनगर, गेवराई, पाटोदा, पाथर्डी आदी भागातील हजारो ऊसतोडणी मजूर आपल्या कुटुंबासह आणि संसारउपयोगी साहित्य घेऊन कारखाना परिसरात दाखल झाले आहेत. पुढील जवळपास सहा महिने ते या परिसरातच मुक्कामी असणार आहेत. ऊसतोडणी कामगार निवासी तळ व गाडीतळावर वर्षातील सहा महिने शुकशुकाट असतो, पण आता हा परिसर त्यांच्या येण्याने गजबजू लागला आहे.
वाफसा मिळेल तिथे तोडणी सुरू
दरवर्षी हे कामगार दिवळी संपल्यानंतर लगोलग एक दिवसांनंतर सोमेश्वरनगर परिसरात दाखल होतात, पण या वर्षी सततचा होत असलेला अवकाळी पाऊस व विधानसभेच्या निवडणुका यात हंगाम सुरू होण्यासाठी उशीर झालेला आहे. अवकाळी पावसामुळे जास्त ओलिताखाली असलेले क्षेत्रांमध्ये अजूनही वाफसा नाही, त्यामुळे ऊसतोडणी कामगारांना जिथे वाफसा उपलब्ध आहे त्या शेतात उसाची तोडणी करावी लागणार आहे.
कामगार संसार उभारण्यात मग्न
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना परिसरात ऊसतोडणी कामगार आपला संसार उभारण्यात मग्न झाले आहेत. बांबूच्या काठ्यांची झोपडी उभारणे, कारखान्यांकडून चटई आणून झोपडीला बांधणे, त्यावरून उसाचे पाचटाने झोपडी शेकरणे आदी कामांची लगबग सुरू झाली आहे. तर महिला कामगारांनी झोपडी शेणाने सारवण्यास सुरुवात केली आहे. कारखान्यांतील काम सुरळीत होण्यासाठी किमान काही दिवस लागणार आहेत. तोपर्यंत करार केलेले सर्व कामगार येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
बाजारपेठांनाही मिळणार नवी संजीवनी
सोमेश्वररनगर परिसरातील दुकानदार व्यावसायिक ही बाजारपेठ संपूर्णपणे सोमेश्वर कारखान्याच्या अर्थव्यवस्थेवर ती अवलंबून आहे. यंदा कारखाना सुरू होण्यास एक महिना उशिर झाला आहे, त्यामुळे अर्थव्यस्था मंदावली होती. दरम्यान, कारखाना कार्यक्षेत्रावर आता ऊसतोडणी कामगारांच्या येण्यामुळे आता बाजारपेठांमध्ये मालाची खरेदी-विक्री वाढणार असल्यापने बाजारपेठेला नवी संजीवनी मिळाले, असा आशावाद व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे.