मुंबई – “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याही सभांना जेवढी गर्दी झाली नाही, तेवढी गर्दी पंढरीच्या नगरीमध्ये जमवून दाखवण्याची किमया सावंत बंधूंनी करून दाखवली,’ असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे. या वक्तव्यातून सावंतांनी स्वतःची तुलना ठाकरे-वाजपेयींशी केल्याने त्यावरही पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात तानाजी सावंत यांनी हे विधान केले. मंगळवारी वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. या कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी आपल्या सभेला होणाऱ्या गर्दीची तुलना दिवंगत नेत्यांशी केली.
सावंत म्हणाले, सोलापूरच्या जनतेला माहीत होते, जे पटांगण आपण सभेसाठी घेतले ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्याही सभेला पूर्ण भरले नाही. आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याही सभा झाल्या. पण त्या सभांनाही मैदान भरेपर्यंत गर्दी कधी जमली नाही. अडवाणीजी यांच्याही सभांना तेवढी गर्दी झाली नाही. ती किमया या पंढरीच्या नगरीमध्ये सावंत बंधूंनी 2017-18 मध्ये सात लाख लोकांचा मेळावा भरवून करून दाखवली.
घरचा आहेर
तानाजी सावंत यांनी आपल्याच पक्षातील दिवंगत नेत्यांशी स्वतःची तुलना करून स्वपक्षीयांना घरचा आहेर दिला आहे. या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातून तीव्र टीकेला त्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सावंतांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. मंगळवारीच त्यांनी फडणवीसांच्या आदेशाने बंडखोरी केल्याचे सांगत वादाला तोंड फोडले होते.