मुंबई – ‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं गेलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच “तानाजी मालुसरे”. तानाजींच्या पराक्रमाची कथा आता ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
नुकतंच ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली आहे. परंतु, याच ट्रेलरमधील काही दृश्यांमुळे आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.
दरम्यान, एका दृश्यात तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधल्याचं दाखलण्यात आलं आहे.
यावर तानाजी मालुसरे यांचे 14 वे वंशज प्रसाद मालुसरे यांनी आक्षेप घेत असा उल्लेख इतिहासात कुठेच नाही असं म्हटलं आहे. चित्रपटातील हा भाग वगळण्याची मागणी प्रसाद मालुसरे यांनी वृत्त वाहिनीशी बोलताना केली आहे.
वृत्तमाध्यमांशी बोलतांना प्रसाद मालुसरे म्हणाले की,’चित्रपटातून मांडला जाणारा इतिहास हा तान्हाजी मालुसरे यांचाच इतिहास म्हणून लोक ओळखतील. ट्रेलरमधील काही ठिकाणी तान्हाजी मालुसरे यांना साखळदंडाने बांधलेलं दाखवलं आहे. इतिहासात आतापर्यंत असं कुठेही वाचलं किंवा ऐकलं नाही त्यामुळे हा प्रसंग चित्रपटातून काढून टाकण्यात यावा. तसेच चित्रपट मालुसरे यांच्या वंशजांनाही दाखवावा अशी मागणी करण्यात आली आहे.’
दरम्यान, सिनेमात अजय देवगण याच्यासोबतच काजोल आणि अभिनेता सैफ अली खान हे मुख्य भूमिकेत असणार आहेत. तर मराठमोळा अभिनेता शरद केळकर हा या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.