ढाका – विश्वचषक स्पर्धेसह लागोपाठच्या सामन्यांमुळे आमच्या खेळाडूंची दमछाक होत आहे. भावी काळातील अन्य आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अव्वल कामगिरी करण्यासाठी तमिम इक्बालने काही दिवस स्पर्धात्मक क्रिकेटमधून विश्रांती घेतली पाहिजे असा सल्ला त्याचा सहकारी व बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनने दिला आहे.
बांगलादेशला श्रीलंकेविरूद्ध नुकत्याच झालेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत तीनही सामन्यांमध्ये पराभवास सामोरे जावे लागले आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर शकीबने विश्रांतीच्या कारणास्तव या मालिकेतून माघार घेतली होती.
या पराभवाची कारणमिंमासा करीत शकीब म्हणाला, तमिमने काही दिवस आपल्या कुटुंबियांसमवेत घालविले पाहिजेत. तमिम हा क्रिकेटच्या तीनही स्वरूपाच्या संघाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्यामुळेच त्याच्यावर शारीरिक व मानसिक दडपण येत आहे. पुढील वर्षी टी-20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे व या स्पर्धेपूर्वी अनेक आंतरराष्ट्रीय सामनेही आम्हाला खेळावयाचे आहेत. हे ओळखूनच तमिमने विश्रांतीबाबत गांभीर्याने घेतले पाहिजे.
बांगलादेशचा संघ नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानबरोबर टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.