Assembly Election: भारताच्या लोकशाही प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा आज गाठला गेला आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमधील मतदारांनी अभूतपूर्व उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावली. १९४७ नंतरचे सर्व विक्रम मोडीत काढत पश्चिम बंगालमध्ये (पहिला टप्पा) ९१ टक्क्यांहून अधिक, तर तामिळनाडूमध्ये जवळपास ८५ टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दोन्ही राज्यांमध्ये महिला मतदारांनी पुरुषांना मागे टाकत लोकशाहीच्या या उत्सवात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यात ९१.७८ टक्के इतके विक्रमी मतदान झाले, तर तामिळनाडूमध्ये ८४.६९ टक्के मतदानाची नोंद झाली. २०११ मध्ये तामिळनाडूमध्ये ७८.२९ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ८४.७२ टक्के मतदान झाले होते, जे आतापर्यंतचे सर्वोच्च मानले जात होते; मात्र यंदाच्या आकडेवारीने हे जुने निकष पार पुसून टाकले आहेत. मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेली जनजागृती मोहीम आणि मतदानाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी केलेल्या तांत्रिक सुधारणांचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे आयोगाने म्हटले आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची आघाडी. पश्चिम बंगालमध्ये ९२.६९ टक्के महिलांनी मतदानाचा हक्क बजावला, तर पुरुषांचे प्रमाण ९०.९२ टक्के राहिले. तामिळनाडूमध्येही हीच स्थिती पाहायला मिळाली, तिथे ८५.७६ टक्के महिलांच्या तुलनेत ८३.५७ टक्के पुरुषांनी मतदान केले. तृतीयपंथी समुदायानेही या प्रक्रियेत हिरहिरीने भाग घेतला असून तामिळनाडूमध्ये ६०.४९ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ५६.७९ टक्के तृतीयपंथीयांनी मतदान केले. ३८६ विधानसभा मतदारसंघांतील ९.३३ कोटींहून अधिक मतदारांसाठी निवडणूक आयोगाने ६ लाख कर्मचारी आणि १,१९,४४० मतदान केंद्रांची व्यवस्था केली होती. पारदर्शकता जपण्यासाठी सर्व केंद्रांवर थेट वेबकास्टिंगची सुविधा करण्यात आली होती. मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएमवर उमेदवारांचे रंगीत फोटो, स्पष्ट वाचनीय माहिती स्लिप आणि प्रत्येक केंद्रावर मतदारांची संख्या १२०० पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली होती. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर आणि वाहतूक व्यवस्थेसारख्या विशेष सुविधाही पुरवण्यात आल्या होत्या. या विक्रमी मतदानामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांनाही मोठी धार आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील सभांमध्ये या मतदानाला ‘परिवर्तनाचे वादळ’ असे संबोधले. महिला आणि तरुणांनी तृणमूल काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आघाडी उघडल्याचे सांगत, यंदा कमळ नक्कीच फुलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसरीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘सिंडिकेट राज’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत तृणमूलवर हल्ला चढवला. मात्र, मतदानादरम्यान काही ठिकाणी हिंसक घटनाही घडल्या. मुर्शिदाबाद आणि आसनसोलमध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमकी झाल्या, तर भाजप उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. तामिळनाडूमध्ये राजकीय संघर्ष वेगळ्या पातळीवर दिसून आला. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी हे मतदान लोकशाही आणि सामाजिक न्याय जपण्यासाठीची चळवळ असल्याचे म्हटले, तर अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी परिवहन व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रणित आघाडी आणि अण्णा द्रमुक-भाजप महायुती यांच्यात थेट सामना असला, तरी विजय यांच्या पक्षामुळे ही लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुजरात आणि महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्येही सरासरी ५५ ते ५९ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमधील उर्वरित १४२ जागांसाठी २९ एप्रिल रोजी मतदान होईल, तर तामिळनाडू आणि बंगाल या दोन्ही राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर होतील. या ऐतिहासिक मतदानामुळे आता सत्तेची गणिते कोणाच्या बाजूने झुकणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.