चेन्नई – तामीळनाडूतील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री के.पलानीस्वामी हेच सत्तारूढ अण्णाद्रमुकचे चेहरा असतील. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शनिवारी पक्षाने अंतिम शिक्कामोर्तब केले.
तामीळनाडूत चालू वर्षी एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. ती निवडणूक तोंडावर आली असतानाच काही काळ आधी अण्णाद्रमुकमध्ये नेतृत्वावरून धुसफूस सुरू झाली. उपमुख्यमंत्री ओ.पन्नीरसेल्वम यांना आगामी निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवावे, अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी लावून धरली.
त्यामुळे अण्णाद्रमुकमध्ये दुही असल्याचे चित्र पुढे आले. मात्र, काही दिवसांपूर्वी पलानीस्वामी आणि पन्नीरसेल्वम यांनी नेतृत्वाच्या मुद्द्यावर सामोपचाराने तोडगा काढला. पलानीस्वामी यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत पन्नीरसेल्वम यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर अण्णाद्रमुकच्या निर्णय प्रक्रियेत सर्वोच्च स्थान असणाऱ्या पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेची शनिवारी बैठक झाली.
त्या बैठकीत पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आगामी निवडणुकीत अण्णाद्रमुकपुढे प्रामुख्याने द्रमुक-कॉंग्रेस आघाडीचे आव्हान असेल. अण्णाद्रमुक आणि भाजपची युती जवळपास निश्चित झाली आहे. त्याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते कमल हासन यांचा पक्ष (मक्कल निधी मय्यम) रिंगणात उतरल्याने निवडणुकीची रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.