नवी मुंबई: तळोजा कारागृहात कोरोना विषाणूचा मोठ्याप्रमाणावर फैलाव झाला आहे. त्यामुळे अनेक कैदी कोरोनाबाधित झाले असून प्रशासन मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तळोजा कारागृहाचे अधीक्षक कौस्तुभ कुर्लेकर यांच्या विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक शेरिंग दोरजे आणि पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद (जेल) यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे तळोजा कारागृहात कैद्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक कैद्यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असूनही तुरुंग प्रशासन त्यांच्याकडे लक्ष पुरवत नाही. मुळात तळोजा तुरुंगात कैद्यांची कोरोना चाचणीच केली जात नाही. कोरोनाच्या उपचाराखाली कोरोनाबाधित कैद्यांना केवळ आयुर्वेदिक औषधे दिली जात आहेत, असे या तक्रारीत म्हटले आहे.
गेल्यावर्षी तळोजा कारागृहात चार कैद्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर या मृत कैद्यांच्या नातेवाईकांनी अनेकदा चौकशीची मागणी करुनही त्यांची तक्रार कोणीही ऐकून घेतलेली नाही. 30 एप्रिलला विशाल दसरी या कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला वेळ निघून गेल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे प्रशासनाने या सगळ्याची दखल घेत तळोजा तुरुंगाची पाहणी करावी, अशी मागणी शकील अहमद यांनी केली आहे.
तुरुंगातही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने मोठ्या प्रमाणावर कैद्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांतील उच्च स्तरीय समितीने गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या निर्देशानुसार कैद्यांना तुरुंगातून सोडण्याचा निर्णय घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
गेल्या वर्षी कोर्टाने सर्व कैद्यांना जामिनावर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अनेक कैद्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर सोडण्यात आलेले सर्व कैदी परत तुरुंगात आले आहेत. अनेक तुरुंगामध्ये क्षमतेपेक्षा अधिक कैदी भरलेले आहेत. त्यामुळे कैदी आणि कर्मचारीही संक्रमित होत आहेत. त्याची दखल चीफ जस्टीस एन. व्ही. रमना यांनी घेत हे आदेश जारी केले आहेत.