लडाख/ नवी दिल्ली – भारत-आणि चीनदरम्यान लष्करी अधिकारी पातळीवरची महत्त्वपूर्ण चर्चा आज सकाळी 11. 30 वाजता पूर्व लडाखच्या चुशुल सीमा चौकीवर सुरू झाली. तत्पूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी 5 जुलै रोजी भेट घेतली आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन्ही देशांच्या सैन्याला मागे सरकण्याविषयी चर्चा केली होती.
भारत आणि चीनच्या मुख्य कमांडरमध्ये काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या चर्चेच्या प्रक्रियेमधील या महिन्याची ही पहिली बैठक म्हणजे वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने टाकले गेलेले पहिले पाऊल होते.
कोर कमांडर्स यांच्यात 30 जूनच्या बैठकीनंतर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गॅलवान, गोगरा आणि हॉटस्पिरिंगमधून यापूर्वीच माघार घेतली आहे. आजच्या बैठकीदरम्यान दोन्ही सैन्य एकमेकांपासून आणि एलएसीपासून दूर नेण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा होणे अपेक्षित आहे.
पूर्वी झालेल्या बैठकीत निश्चित झालेल्या आराखड्यानुसार हे सैन्य मागे घेतले जात आहे ना, याचा आढावा आजच्या बैठकीत घेतला जाणे अपेक्षित आहे. याशिवाय पेन्गोंग त्सो आणि देप्सांग प्लॅन्स येथील फिंगर-4 येथेही निःशस्त्रीकरणाबाबत आजच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.