पुणे – “आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी’, असा सल्ला शनिवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला दिला.
देशातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहाना, पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि मीना हॅरिस या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी ट्वीटरवर आपली भूमिका मांडली होती. त्यावर भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी शेतकरी आंदोलन हा देशांतर्गत प्रश्न असल्याचे ट्वीट केले होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी पुण्यात कार्यक्रमासाठी आलेल्या पवारांनी माध्यमांशी बोलताना सचिनला हा सल्ला दिला. ते म्हणाले, सचिन, लता मंगेशकर यांच्या ट्विटवर समाज मोठ्या प्रमाणावर भावना व्यक्त होत आहे. आपले क्षेत्र सोडून अन्य विषयांवर बोलताना काळजी घ्यावी, असा माझा त्याला सल्ला राहील.
देशातील मोठा कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. आंदोलकांना सहानुभूती मिळते हे खरे तर चांगले नाही. आपले पंतप्रधान तिकडे जे बोलले होते. आता त्याची प्रतिक्रिया उमटत आहे. हे नेते शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात, कधी अतिरेकी म्हणतात. ते शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत, असेही पवार यांनी सुनावले.
शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी यांसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतल्यास मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही. पण, स्वातंत्र्यानंतर असे कधी घडले नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरून त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. सर्वोच्च स्तरावर प्रयत्न केल्यास शेतकरी नेत्यांनीसुद्धा चर्चा करावी. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, असे पवार यांनी नमूद केले.