पुणे – शासनाकडून दरवर्षी दरडप्रवण क्षेत्र गावांची माहिती घेतली जाते. पावसाळ्यामध्ये त्या गावातील नागरिकांना धोक्याच्या अगोदर स्थलांतरित केले जाते. मात्र, रायगडमधील तळीये गाव हे दरडप्रवण क्षेत्रात येत नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात करोना आढावा बैठकीनंतर पवार बोलत होते. पवार म्हणाले, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुण्याच्या काही भागात जोरदार पावसामुळे या जिल्ह्यांना फटका बसला असून जागतिक तापमानवाढीचा फटका असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
कोल्हापूर, रायगड, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पुणे, सातारा सांगली, मुंबई उपनगरे असे नऊ जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. त्यामध्ये कोल्हापुरात 209, सांगली 92, सातारा 120 आणि पुण्यात 421 गावे बाधित झाली आहेत. तेथील बचाव कार्यासाठी एनडीआरएफची पथक कार्यरत असून, इतर 14 पथके यात आर्मी-नेव्हीची आहेत.
नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता
राज्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सातारा, महाड, पोलादपूर, पाटण परिसरांचा समावेश आहे. घाटातही दरडी कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, पंचनामे झाल्यावर निश्चित आकडा येईल. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे पवार यांनी सांगितले.
बाधितांना तांदूळ, डाळ देणार
आपत्तीच्या काळात नागरिकांना गहू, तांदूळ आणि रॉकेल देतो. पण पावसात सर्व वाहून गेलेलं असतं. पीठ गिरण्याही बंद असतात. त्यामुळे आपत्तीग्रस्तांना तांदूळ, रॉकेल आणि डाळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना तत्काळ खिचडी बनवून खाता येईल. तसेच एनजीओच्या मदतीने शिवभोजन केंद्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितले.