इस्लामाबाद – बऱ्याच महिन्यांच्या चर्चेनंतर अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला होता; पण आता हा करार तुटण्याच्याच बेतात आहे, असे तालिबानने म्हटले आहे. अमेरिकेलाच त्यांनी त्यासाठी जबाबदार धरले असून तालिबानने म्हटले आहे की, अमेरिकेने नागरी वस्तीवर अफगाणिस्तानात हल्ला केला आहे हा कराराचा भंग आहे. तसेच या करारात ठरल्यामुळे अफगाणिस्तानने तालिबानचे पाच हजार कैदी अजून सोडलेले नाहीत. त्यामुळे हा करार आता संपुष्टातच येण्याची शक्यता आहे.
आम्ही आंतरराष्ट्रीय फौजांवर हल्ले केलेले नाहीत. आणि आम्ही आमचे हल्ले ग्रामीण भागा पुरतेच मर्यादित केले आहेत. आम्ही अफगाणी फौजांवर शहरी भागात हल्ले केलेले नाहीत तसेच मोठ्या शहरातील लष्करी कार्यालयांवरही आम्ही हल्ले केलेले नाहीत असे तालिबानने स्पष्ट केले आहे. अमेरिका आणि अफगाणिस्तानने कराराचा भंग करणारी कृती केल्यास आम्ही आणखी हल्ले करू असा इशाराही तालिबानने दिला आहे.
आम्ही आमच्या हल्ल्यांचे प्रमाण कमी केले आहे असा दावाही तालिबानने केला आहे. तालिबानच्या म्हणण्यानुसार अमेरिका व अफगाण सरकारने या करारतील अनेक मुद्द्यांचे उल्लंघन केल्यामुळे अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या कराराच्या अस्त्विालाच धोका निर्माण झाला आहे. तालिबानने अपहरण केलेले एक हजार सरकारी कर्मचारी सोडून देण्याच्या बदल्यात अफगाणिस्तान सरकारने तालिबानचे पाच हजार गनिम सोडून देण्याचे ठरले आहे. पण त्यात अफगाणिस्तान सरकारने मोडता घातला आहे. अफगाणिस्तान सरकारच्या या भूमिकेमुळे अमेरिकाही नाराज झाली आहे असे सांगण्यात येते.