पाकिस्तानातील जिहादी संघटना जैश ए मोहम्मद आणि तालिबानी नेत्यांमध्ये कंदाहर येथे ऑगस्ट महिन्यात बैठक झाल्याची माहिती आता समोर येत आहे. ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात ही बैठक झाल्याचे कळते. जैश-ए-मोहम्मदला भारताविरोधी कुरघोड्यांसाठी तालिबान्यांचे सहकार्य अपेक्षित आहे. एएनआय यावृत्तसंस्थेने याबाबची एक बातमी दिली आहे. गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा दाखला देत एएनआयने हे वृत्त दिले आहे.
सध्या सोशल मिडियावर सुरू असणाऱ्या गोष्टींवर आम्ही लक्ष द्यायला सांगितले आहे. इंटेलिजन्स एजन्सी यासाठीचे ट्रॅकिंग करत आहेत. पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांकडून श्रीनगर येथे ग्रेनेड हल्ला करण्यात येणार असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली आहे. त्या अनुषंगाने दोन पाकिस्तान दहशतवाद्यांचे ट्रॅकिंग करण्यात येत आहे. या घटनेच्या निमित्ताने सर्व यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. त्यामुळेच सर्वच राज्यांना सुरक्षेसाठीचे ड्रील राबवायला सांगितले आहेत. त्यासोबतच दहशतवाद विरोधी पथकेही सज्ज झाली आहेत.
तालिबानच्या दहशतवाद्यांकडूनच जगभरातील दहशतवादाला खतपाणी घालण्यात येते असे आतापर्यंत निदर्शनास आले आहे. नुकताच २६ ऑगस्टला झालेला ISIS-K मार्फतचा बॉम्बस्फोट म्हणजे तालिबानमध्ये दहशतवादी कारवाया सुरू झाल्याचे समजले आहे. त्यामुळेच भारतही या कारवायांमुळे अलर्ट झाला आहे.
अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर जैशच्या वतीनेही आनंद साजरा करण्यात आला होता. जैशने प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार तालिबानचा अफगाणिस्तानातील विजय म्हणजे मुजाहिदीन आणि पवित्र योद्ध्यांना इस्लामच्या लढ्यासाठी प्रेरणा देत राहील असे म्हटले आहे.
अफगाणिस्तानात तालिबान्यांची सत्ता आल्यानंतर संरक्षण विभागाचे प्रमुख बिपिन रावत यांनीही दहशतवादी कारवायांची झळ ही भारताला बसू शकते, असे मत मांडले आहे. अफगाणिस्तानात जे घडते आहे, ते आम्ही अपेक्षितच केले होते. पण ज्या वेगाने घडामोडी घडताहेत त्यानुसार अपेक्षेपेक्षाही वेगाने हे सगळ घडते आहे. आम्ही येत्या दोन महिन्यांमध्ये या सगळ्या घडामोडी अपेक्षित करत होतो. पण त्यापेक्षाही वेगाने सगळ घडले. त्यामुळेच या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्ही योजनाही तयार केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अफगाणिस्तानात तालिबान्यांनी सत्ता मिळवल्यानंतर तालिबान्यांनी स्पष्ट केले की, जम्मू आणि काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. तालिबानचा प्रवक्ता असलेला झबीउल्लाह मुजाहिदने काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केले की, पाकिस्तान हे तालिबान्यांसाठी दुसरे घर असल्यासारखेच आहे. भारत आणि पाकिस्तातनने जम्मू काश्मिरच्या मुद्द्यावर एकत्र बसून बोलणी करत हा वाद सोडवण्याची गरज आहे. ही दोन्ही राष्ट्रे एकमेकांची शेजारी राष्ट्रे आहेत. या दोन्ही राज्यांचे हित हे एकमेकांशी संबंधित असल्याचेही तालिबानने म्हटले होते.
मसूद अजहरला १९९९ मध्ये भारतीय यंत्रणांनी मुक्त केले होते. कंदाहर विमान अपहरण नाट्यानंतर ओलीस असलेल्या भारतीयांना सोडण्याच्या मोबदल्यात अजहरची सुटका झाली होती. तालिबान आणि जैशची गणना ही वैचारिक कॉम्रेड म्हणून होते. नव्याने समोर आलेल्या वृत्तानुसार जैशचे मोठ्या प्रमाणावर सदस्य हे अफगाणिस्तान तुरूंगातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे या सुटका झालेल्या जैशच्या सदस्यांकडून भारतात दहशतवादी हल्ल्यांची शक्यता यंत्रणांनी वर्तवली आहे.