एखाद्या राष्ट्रावर दहशतवाद्यांची सत्ता आल्यावर तेथे लोकशाहीत मिळणाऱ्या अधिकारांची आणि प्रशासन व्यवस्थेची अपेक्षा करू शकत नाही. पण आपल्या पहिल्या कार्यकाळात तालिबानने जी अराजकता माजविली होती ती दुसऱ्या कार्यकाळात नक्कीच नाही.
एखाद्या राष्ट्राच्या सर्वोच्च सत्तेला दहशतवाद्यांनी हात घालणे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून वर्षभर त्या राष्ट्राचा कारभार चालविणे ही काही सामान्य गोष्ट नाही. वर्षभरापूर्वी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष अश्रफ घनी यांनी देश सोडून पलायन केल्यानंतर ज्या विद्युत वेगाने तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर आला ते पाहता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा जंगलराज येईल अशी अटकळ बांधली जात होती; पण तसे न होता पूर्वी केलेल्या चुकांमधून धडा घेत तालिबानने आपल्या कार्यपद्धतीत बदल केल्याचे दिसून येते.
तालिबानच्या कार्यपद्धतीत झालेला बदल
1996 ते 2001 या काळात मुल्ला ओमरच्या नेतृत्वात तालिबान पहिल्यांदा अफगाणिस्तानच्या सत्तेवर आला. आपल्या या कार्यकाळात तालिबाने अफगाण जनतेवर अमानुष अत्याचार केले. संपूर्ण जगातील दहशतवाद्यांचे नंदनवन अशी अफगाणिस्तानची ओळख त्या काळात जगात झाली. अल् कायदाचा म्होरक्या ओसामा-बिन-लादेन आणि आयमन्-अल्-जवाहिरी याच काळात अफगाणिस्तानच्या आश्रयाला आले. त्यातून पुढे अमेरिका दूतावासांवर करण्यात आलेले बॉम्बहल्ले (7 ऑगस्ट 1998), वर्ल्ड सेंटरवर झालेला दहशतवादी हल्ला (11 सप्टेंबर 2001) यांसारखे दहशतवादी हल्ले अल्-कायदाने तालिबानच्या मदतीने केले. अखेरीस नोव्हेंबर 2001 मध्ये अमेरिकेने तालिबानची सत्ता उलथवून टाकल्यानंतर गेल्या वर्षी म्हणजे 20 वर्षांनी ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या
सर्वोच्च सत्तेवर विराजमान झाला. परंतु, हे करीत असताना आपल्यावर 2001 सारखी परिस्थिती येणार नाही याची पूर्ण काळजी तालिबान आणि त्यांच्या नेत्यांनी घेतल्याचे दिसून येते.
जागतिक राजकारणात सर्वांना मान्य होईल अशी दहशतवादाची कोणतीही व्याख्या केली गेली नाही. एखाद्या राष्ट्राचा दहशतवादी हा दुसऱ्या राष्ट्रासाठी क्रांतिकारी किंवा स्वातंत्र्ययोद्धा असतो. उदाहरणार्थ, भारतातील जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणारे मसूद अजहर किंवा सईद सलाउद्दीन हे लोक भारतासाठी दहशतवादी आहेत. परंतु, याच लोकांना पाकिस्तान आझाद काश्मीरचे सैनिक म्हणतो. त्यामुळे संयुक्त राष्ट्र आम सभा व सुरक्षा परिषदेत जेव्हा जेव्हा दहशतवादावर चर्चा होते तेव्हा पाकिस्तान व त्याच्या समर्थक राष्ट्रांनी (उदा.- चीन, मलेशिया, तुर्की) खोडा घालण्याचे काम केले आहे. दहशतवादाची एक कायम व्याख्या असावी आणि जागतिक दहशतवादावर संयुक्त राष्ट्राचा एक कलमी कार्यक्रम असावा यासाठी 1996 मध्ये भारताने संयुक्त राष्ट्र आमसभेत दाखल केलेले “इंटरनॅशनल कन्व्हेन्शन ऑन सप्रेशन ऑफ टेररिझम’ हे विधेयक आज 25 वर्षांनतरही धूळ खात पडून आहे.
भारताने स्वातंत्र्यापासूनच दहशतवादासंबंधी “झिरो टॉलरन्स पॉलिसी’चा अवलंब केला आहे. दहशतवादासंबंधित कसलीही तोडजोड भारत स्वीकारणार नाही हे भारताने विविध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात नीती आणि मूल्ये यांपेक्षा राष्ट्रहित अधिक महत्त्वाचे असते. एखाद्या राष्ट्राचा कारभार नीती आणि मूल्यांना धरून नाही म्हणून जेव्हा तुम्ही त्या राष्ट्राचा बहिष्कार करता तेव्हा तुमची शत्रू राष्ट्रे त्या राष्ट्राला आपला मित्र बनवितात. अशावेळी जेव्हा गरज असते आणि आपणच बहिष्कार केलेला राष्ट्राशी तडजोड करण्याची आपल्यावर वेळ येते तेव्हा आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो.
तालिबानच्या पहिल्या कार्यकाळात भारताने तालिबानचा बहिष्कार केल्यानंतर भारताला अशाच प्रकारच्या अडचणींचा सामना हा करावा लागला होता. त्यातून कंदाहर विमान अपहरण (24 डिसेंबर 1999) सारखे प्रकार घडले.
पाकिस्तानच्या प्रेरणेतून या काळात तालिबानने जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादाला खातपाणी घातले. अशाप्रकारे तालिबानच्या बहिष्काराची मोठी किंमत या काळात भारताला चुकवावी लागली होती. तालिबानच्या दुसऱ्या कार्यकाळात मात्र भारताने आपल्या जुन्या चुका पुन्हा केल्या नाहीत. भारताचे प्रतिनिधी हे वेळोवेळी तालिबानशी चर्चा करीत असतात. अफगाणिस्तानच्या जनतेला अन्नधान्याचा पुरवठा गेल्या वर्षभरापासून भारताकडून सुरू आहे. अफगाणिस्तानच्या भूमीवर भारताविरोधात होणाऱ्या कटकारस्थानांना जागा दिली जाणार नसल्याची ग्वाही तालिबानने भारताला दिलेली आहे. कदाचित म्हणूनच जम्मू आणि काश्मीरमध्ये तालिबानच्या पहिल्या कार्यकाळात जी अशांतता माजली होती ती या वर्षभराच्या काळात दिसून आलेली नाही.
शेवटी दहशतवाद्यांवर कितपत विश्वास ठेवावा हा संशोधनाचा विषय आहे. पण जर सत्तेत राहायचे असेल तर आपल्याला इतरांशी संबंध ठेवूनच कार्य करावे लागेल हे तालिबानला कळून चुकले आहे. म्हणूनच तालिबानच्या पहिल्या राजवटीत माजलेली अराजकता दुसऱ्या राजवटीत आतापर्यंत दिसून आलेली नाही.