अमेय गुप्ते
मराठी साहित्यात दर्जेदार कथेचा आस्वाद आपल्या लीलया लेखणीने साहित्यप्रेमींना देणारे ज्येष्ठ लेखक
कै. अरविंद गोखले यांच्या जन्मशताब्दी वर्षातील (24 ऑक्टोबर) स्मृतिदिनानिमित्त!
मराठी साहित्यात कथाविश्वातील एक तारा उदयाला आला. तो म्हणजे कथाकार कै. अरविंद विष्णू गोखले! दि. 19 फेब्रुवारी 1919 रोजी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. या शाळेतून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांचे पुढील शिक्षण साहित्याला परिपोषक नसणाऱ्या विज्ञान शाखेतून झाले. “इंपीरिअल ऍग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट’मधून सायटोजेनिटिक्सचा अभ्यासक्रम पूर्ण केला. अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात तांत्रिक वृत्तपत्रविद्येचा अभ्यास करून त्यांनी एम.एस. ही पदवी मिळविली.
1941 मध्ये “दक्षिणा फेलो’ होण्याचा बहुमान त्यांस प्राप्त झाला. 1943 मध्ये ते भारतात परत आल्यावर त्यांनी पुणे येथील कृषी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 1962 पर्यंत नोकरी केली. 1963 नंतर ते मुंबईच्या धरमसी कंपनीत नोकरी करीत होते. “हेअर कटिंग सलून’ ही त्यांची पहिली कथा पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या नियतकालिकात 1935मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांचे नजराणा (1944), माहेर (1949), कमळण (1952), मिलन (1951), जागरण (1952), कातरवेळ (1958), शुभा (1957), मिथिला (1959), व्रती (1962), विघ्नहर्ती (1963), रिक्ता (1962), दागिना (1972) नकोशी (1977), अनवांच्छित, अनामिका, अक्षता, आले पाक, कथाई, कथांते, कथाष्टके, केळफूल, गौडबंगाल, चाहूल, जन्मखुणा, देशांतर, निर्वाण, मंजुऴा, शकुंत, शपथ हे कथासंग्रह तर अमेरिकेस पाहावे जाऊन हे प्रवास वर्णन अशी दर्जेदार साहित्य संपदा प्रसिद्ध आहे. स्वतंत्र कथा लेखनास त्यांनी काही अमेरिकन कथांचे अनुवादही केले. तर त्यांच्या अनेक कथांचे युरोपीय व भारतातील प्रादेशिक भाषेतून अनुवाद झाले आहेत.
मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ना. सी. फडके, वा. कृ. चोरघडे, दि. बा. मोकाशी, व्यंकटेश माडगुळकर यांच्या निवडक कथांचे संपादन केले आहे. गोखले यांच्या कथांतून वेगवेगळ्या स्थळकाळातील बहुरंगी विश्व अगदी सहजपणे उभे केले असून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सूक्ष्म, अंतर्गत ताण त्यांनी बारकाईने टिपले आहेत. त्यांनी 1985 मध्ये बांगलादेशचा दौरा केला व तेथील संचारावर आधारित लेख लिहिले ते त्यांच्या “गौडबंगाल’ या कथासंग्रहात समाविष्ट केले आहेत. यातील बांगलादेशी साहित्य हा लेख साहित्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यांच्या “गंधवार्ता’ या कथेला आफ्रोआशियाई कथा स्पर्धेत बक्षीस मिळाले होते. त्यांनी इतर भाषेतील कथा या मराठीत आणण्याचे अथक प्रयत्न केले. त्यामुळे परमन प्रवेशाची किमया लाभलेले लेखक, असे त्यांच्या विषयी म्हटले जाते.
1947 मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची “कातरवेळ’ ही कथा त्या काळातील गाजलेल्या कथांपैकी एक असून त्यातील कथेची नायिका अक्का असून या कथेतून हळूहळू बांधत नेलेला रूपबंध आणि शेवटच्या परिच्छेदात व वाक्यात गाठलेला उत्कर्षबिंदू यातून गोखल्यांचे कथारचनेचे कौशल्य स्पष्ट होते. त्यांचे काही दीर्घ कथा संग्रह व ललित लेखही प्रसिद्ध आहेत. त्यांनी मराठीतील 1959 ते 1963 मधील निवडक कथांची वार्षिके प्रसिद्ध केली आहेत. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर यांचे व गोखले यांचे अगदी जवळचे संबंध होते.
1973 मध्ये गदिमांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यावर गोखले यांनी स्वतः पुण्यातील पंचवटी या गदिमांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले. यावर ग.दि.मा म्हणाले, गोखले खरं हा मान तुमचा आहे. त्यांचे अनेक वर्षे मुंबईतील 06, रागिणी, साहित्य सहवास, वांद्रे येथे अनेक वर्षे वास्तव्य होते. मुंबई-पुणे महामार्गावर एशियाड बस सुरू झाल्यानंतर त्यांचा एशियाड हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला. पण त्याच बसमधून प्रवास करत असताना दि. 24 ऑक्टोबर 1992 मध्ये बसचा अपघात झाला व त्यांचे निधन झाले. एक प्रतिभावंत व प्रसिद्धी परान्मुख तारा साहित्य विश्वातून निखळला. त्यांच्या कथा आपण जर वाचल्या तर खऱ्या अर्थाने त्यांची जन्मशताब्दी साजरी होईल यात शंका नाही.