पुणे – राज्य शासनाने रखडलेल्या तलाठी भरतीप्रक्रियेला मान्यता दिली आहे. त्यामुळे अहमदनगर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, नांदेड, बीड, धुळे, नंदूरबार या जिल्ह्यांमधील भरतीप्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे. अहमदनगर जिल्हा वगळता उर्वरित जिल्ह्यातील भरती प्रक्रिया विनाविलंब पूर्ण करण्याचे राज्य शासनाने संबंधित विभागीय आयुक्तांना निर्देश दिले आहेत. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य शासनातर्फे 2019 मध्ये तलाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. राज्यातील 26 जिल्ह्यांमधील कोकण विभागातील मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तसेच अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यात तर नागपूर विभागात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आणि औरंगाबाद विभागात जालना परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्याच प्रमाणे नाशिक विभागात जळगाव, नाशिक आणि पुणे विभागात पुणे, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांमधील भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
तथापि, करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग वगळता कोणत्याही विभागाने कोणत्याही प्रकारची नवीन भरती करू नये, असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे उर्वरित जिल्ह्यांमधील तलाठी भरती प्रक्रिया रखडली होती. ही भरती लवकर सुरू करावी, अशी मागणी उमेदवारांतून होत होती.