चेन्नई : एखाद्या पुरुषाची पत्नी ही त्याच्यापासून विभक्त राहत असेल आणि तिने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून टाकले असेल तर ते पतीसाठी मानसिक क्रौर्यच असेल, असे मद्रास उच्च न्यायालयाने म्हटले आहे. याप्रकरणी न्यायालयाने पतीचा घटस्फोट अर्ज मंजूर केला आहे. न्यायमूर्ती व्ही.एम.वेलुमणी आणि न्यायमूर्ती एस. साँथर यांच्या खंडपीठाने इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या सी. शिवकुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हे निरीक्षण नोंदवले आहे.
दरम्यान, पती-पत्नीच्या घटस्फोटाचे कारण ‘मंगळसूत्र’ बनले असून यासंबंधी मद्रास न्यायालयाकडून पतीची याचिका मंजूर झाली आहे. स्थानिक कौटुंबिक न्यायालयाचा 15 जून 2016 रोजीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली होती. पत्नीने घटस्फोट देण्यास नकार दिला होता त्यामुळे याप्रकरणी महिलेची चौकशी केली. यावेळी तिने कबूल केले की, विभक्त होण्याच्या वेळी तिने तिच्या लग्नाचे प्रतीक म्हणून एक सोन्याची साखळी घातली होती. मात्र आता त्या महिलेने ती साखळी काढून टाकली आहे.
दरम्यान, मी केवळ साखळी काढून ते सोन्याचे प्रतिक ठेवले असल्याचे त्या महिलेने स्पष्ट केले आहे. महिलेच्या वकिलांनी हिंदू विवाह कायद्याच्या कलम 7 चा पुरावा देत सांगितले आहे की, गळ्यात तो सोन्याचा ऐवज घालण्याची आवश्यक नाही आणि त्यामुळे त्या महिलेने तो काढून टाकल्याने वैवाहिक नातेसंबंधावर कोणताही परिणाम होणार नाही.