मुंबई – ‘ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगची तातडीने भेट घेत मतमोजणीपूर्वी निवडक मतदान केंद्रांमधील “व्हीव्हीपॅट’मधील पावत्यांची पडताळणी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. अशातच आता वृत्तमाध्यमांशी संवाद साधतांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधी पक्षांना चांगलाच टोला लगावला आहे.
रामदास आठवले म्हणाले, “ईव्हीएम’मध्ये छेडछाड प्रकरणी जर निवडणुक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या निर्णय घेतला तर त्यासाठी सुद्धा आमच्या पक्ष्याची तयारी आहे. जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तरी सुद्धा आम्हीच जिंकू आणि त्यावेळी सुद्धा विरोधी पक्ष बोगस निवडणूका झाल्याचा कांगावा करतील. एखाद्या वेळेस ईव्हीएम मशीन खराब होऊ शकते. मात्र यामुळे “ईव्हीएम’मध्ये छेडछाड झाल्याचा प्रश्न उभा करणे योग्य नाही. मला असे वाटते की, विरोधी पक्षाच्या “ईव्हीएम’मध्ये छेडछाड करण्यात आल्याच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही. तरी सुद्धा निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या निर्णय घेतलाच तर पुढील पाच वर्षांनंतरच निवडणूका होतील.”