जळोची – बारामती शहरासह तालुक्यातील रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी काटेकोरपणे उपाययोजना राबवा. कोणत्याही परस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे आवश्यक आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
बारामती येथील आढावा बैठकीत उपाययोजनांचा आढावा पवार यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्वलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, उपविभागीय अधिकारी
दादासाहेब कांबळे, मुख्य कार्यकारी अभियंता सुनील पावडे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, गटविकास अधिकारी राहूल काळभोर, बांधकाम पूर्व विभाग कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई,
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता धोडपकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, रुई चे डॉ. सुनील दराडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव आदींसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, करोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लावणे आवश्यक आहे. कसल्याही परिस्थितीत पॉझिटिव्हीटी रेट कमी होणे गरजेचे आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी, विलगीकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनास पूर्ण अधिकार दिले आहेत, स्थानिक पातळीवर प्रशासनाने त्याचा वापर करावा. उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी उपाययोजनांची माहिती दिली.