आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला भारताला सल्ला
नवी दिल्ली : भारतातील आर्थिक मंदीवर आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेदेखील चिंता व्यक्त केली आहे. देशातील आर्थिक मंदीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर पावले उचलली पाहिजेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था हे जागतिक विकासाचे एक प्रमुख इंजिन आहे. त्यामुळे भारताने आपल्या अर्थव्यवस्थेतील मंदीवर तातडीने उपाय करणे गरजेचे असले पाहिजेत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे म्हणणे आहे.
जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक भारतीय अर्थव्यवस्था आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून देशात मंदीची स्थिती आहे. ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. गुंतवणुकीतही घट झाली आहे. यामुळे सरकारच्या कर महसुलाच्या उत्पन्नावर विपरित परिणाम झाला आहे, याकडे नाणेनिधीने लक्ष वेधले.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आशिया-पॅसिफिक विभागाचे रानिल सालगाडो यांनी याविषयी माहिती दिली. अनेक लोकांना गरिबीतून बाहेर काढल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सध्या पेचात सापडली आहे. या पेचातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची नितांत गरज आहे.
विकासाला चालना देण्यासाठी सरकारी निधी वितरित करण्यावरही सरकारकडे मर्यादित संधी उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ यांनी गेल्या आठवड्यात भारताच्या विकासदराचा अंदाज पुढील महिन्यात जाहीर होणाऱ्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक’मध्ये आणखी कमी होण्याची शक्यता वर्तविली होती.