सिमला -हिमाचल प्रदेश भाजपचे अध्यक्ष सत्पालसिंह सत्ती यांनी 1984 मधील शीखविरोधी दंगलींसाठी माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना जबाबदार धरले आहे. एवढेच नव्हे तर, शीख समाजाच्या जखमा भरून काढण्यासाठी राजीव यांना प्रदान करण्यात आलेला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान काढून घेण्यात यावा, अशी मागणीही सत्ती यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठीचा प्रचार तापला असतानाच पुन्हा एकदा शीखविरोधी दंगलींचा मुद्दा पुढे आला आहे. त्या दंगलींचा संदर्भ घेऊन सत्ती यांनी राजीव यांना लक्ष्य केले आहे.
दिल्लीसह देशभरात त्यावेळी 5 हजारहून अधिक शीखांना जाळण्यात आले. त्याचे एकप्रकारे राजीव यांनी समर्थनच केले. त्यामुळे शीखांची हत्या करण्यासाठी कॉंग्रेसजनांना चिथावणी मिळाली. राजीव यांच्या निर्देशावरून मारेकऱ्यांविरोधात गुन्हे नोंदवले गेले नाहीत, असा आरोप सत्ती यांनी एक निवेदन जारी करून केला. राजीव यांना मरणोत्तर सर्वोच्च सन्मान देऊन तत्कालीन कॉंग्रेस सरकारने गुन्हा केला आहे, असे म्हणत सत्ती यांनी कॉंग्रेसचे विद्यमान अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. दंगलींना जबाबदार असणारे कॉंग्रेसचे एक ज्येष्ठ नेते कमल नाथ यांना राहुल यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री बनवल्याचे त्यांनी म्हटले.