ईटानगर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी मोदी सरकारच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याबद्दल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल यांनी इटालियन चष्मा उतरवावा आणि डोळे उघडून पहावे. त्यांना विकास दिसेल, असा शाब्दिक टोला शहा यांनी लगावला.
भाजपशासित अरूणाचल प्रदेशमधील सभेत शहा बोलत होते. केंद्रात कॉंग्रेसची राजवट असताना देशाच्या ईशान्य विभागासाठीचा विकासनिधी मध्यस्थांकडून लाटला जात होता. मात्र, मोदी सरकारने ती भ्रष्टाचाराची संस्कृती संपवली. आता विकासनिधीतील एक पैसाही पारदर्शकतेने वापरला जातो.
ईशान्य विभागात 50 वर्षांत झाला नाही इतका विकास मोदी सरकारने घडवला. आधीच्या सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे एकेकाळी ईशान्य विभाग बंडखोरी कारवायांसाठी ओळखला जायचा. मात्र, मोदी सरकारने बहुतांश बंडखोर गटांशी शांतता करार केले आहेत. त्यामुळे ईशान्येत शांतता प्रस्थापित झाली आहे, असे ते म्हणाले.
मोदी सरकारच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत 9 हजार 600 बंडखोर शरणागती पत्करून मुख्य प्रवाहात सामील झाले. ईशान्येतील तरूणांना गन कल्चरमध्ये आता बिल्कूर रस वाटत नाही. ते स्टार्ट-अप्सच्या माध्यमातून उद्योजकतेकडे वळले आहेत, असा दावाही शहा यांनी केला.