-उत्तम पिंगळे
काल बरेच दिवसांनी प्राध्यापकांना फोन लावला. प्राध्यापक म्हणाले, अलीकडे तुम्ही फोन करणे कमी केलेले दिसते. त्यावर मी म्हणालो, काय सर रोज रोज तेच तेच विषय त्यामुळे काय बोलावे काही समजत नाही. आता आमच्या बाजूचा परिसरही कंटेन्मेंट झोन झाला आहे. बाहेर पडणेही अगदी अशक्य झालेले आहे.
त्यावर सर म्हणाले की, शक्यतो बाहेर पडू नका. अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडून काळजीपूर्वक घरात या.
मी विचारले, सर पुढे काय होणार? असं किती काळ चालणार. एकीकडे आपण अनलॉक करतोय, दुसरीकडे कंटेन्मेंट झोन वाढत आहेत यातून काय निष्पन्न होईल?
सर म्हणाले, आता रोगाचा प्रसार वेगाने वाढत आहे. काळजी घेणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु यातून बाहेर पडण्याकरता लस, औषध निर्माण होणे आवश्यक आहे आणि लवकरच ते होईल अशी अपेक्षा आहे. कारण बहुतेक संशोधकांचे शोध अंतिम टप्प्यावर आलेले आहेत. त्यामुळे जोपर्यंत औषध आणि लस निर्माण होत नाही तोपर्यंत आपण आपली काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
मग मी सरांना विचारले, पण एका आयुर्वेदिक कंपनीने या रोगाबाबत औषधाचा शोध लावल्याचे सांगितले होते; पण त्यावर नंतर बरेच राजकारण व उलटसुलट चर्चा होऊन अंतिमतः बंदी घातली गेली. आता मात्र ते औषध विक्री करता येणार आहे.
त्यावर सर म्हणाले, आपण म्हणता त्यात जरी तथ्य असले तरी त्यात थोडीफार चूक आहे. कंपनीने मुख्य रोगावर त्याचा उपाय होतो असा दावा केला होता, मात्र फक्त प्रतिकारशक्ती वाढते म्हणून ते औषध आणले आहे. बाजारात औषध आणणे सोपी गोष्ट नाही. अनेक प्रकारच्या चाचण्यांतून ते पास झाले की त्याचा शंभर टक्के निकाल येत असेल तर ते औषध बाजारात येते.
मी सरांना म्हटले, ठीक आहे फक्त रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून जरी औषध बाजारात आणले ते बरे झाले. पण सर माझे एक वैयक्तिक मत आहे की, आपण गुटखा, तंबाखू अशा अत्यंत जहरी व विषारी गोष्टी बाजारात केवळ महसूल वाढावा म्हणून आणतो. ते आणताना त्यावर वैधानिक इशाराही दिलेला असतो. तरी प्रचंड प्रमाणात त्यांची विक्री होत असते. तसेच या व्यसनातून पुढे बाहेर पडण्याकरता सरकारी व्यसनमुक्ती केंद्रेही आहेत. म्हणजे इशारा देऊन घातक गोष्टी बाजारात महसुलासाठी आणावयाच्या व त्यातून बाहेर पडण्याकरता समुपदेशन करायचे हा कोणता व्यवहार आहे? या औषधांची विक्री करायला काही हरकत नसावी कारण एकतर ते आयुर्वेदिक असल्यामुळे अपाय होणार नाही, एवढे नक्की.
कित्येक परदेशी कंपन्यांनी गोरेपणाची औषधे भुलवून बाजारात आणली त्यातून फक्त लोकांचा पैसा गेला. असे असताना या आयुर्वेदिक औषधाला बाजारात विक्री बंदी नकोच, असे वाटते. सर त्यावर म्हणाले, हे बाकी शंभर टक्के खरे बोललात, असे बोलून सरांनी फोन ठेवला.