नवी दिल्ली: गरीब आणि स्थलांतरित मजुरांच्या कल्याणासाठी उपाययोजना कराव्यात आणि लघु, मध्यम उद्योगांचे पुनरुज्जीवन यासारख्या चार मागण्या कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केंद्र सरकारपुढे ठेवल्या.
देशात कोविड-19 ची साथ पसरल्यानंतर गरीब, स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास पायी करावा लागला. देशातील बहुसंख्य भारतीयांना रोजगार देणारे लघु आणि मध्यम उद्योग बंद पडायला लागले आहेत. त्यासंदर्भात केंद्र सरकारकडे आपण चार मागण्या मांडत आहोत, असे राहुल गांधी यांनी प्रसारीत केलेल्या रेकॉर्ड केलेल्या संदेशात म्हटले आहे.
देशातील प्रत्येक गरीब कुटुंबाला सहा महिन्यांपर्यंत दर महिन्याला 7,500 रुपये देण्यात यावेत. देशात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी (मनरेगा) योजना किमान 100 दिवसांऐवजी 200 दिवस चालवण्यात यावी. देशातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या पुनरुज्जीवनासाठी आर्थिक पॅकेज देण्यात यावे आणि लॉकडाऊनमुळे घरी परतू न शकलेल्या स्थलांतरितांना घरी पोहोचण्यासाठी वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, अशा चार मागण्या राहुल गांधी यांनी मांडल्या आहेत.
दरम्यान, कॉंग्रेस पक्षाने छेडलेल्या “स्पीक अप इंडिया’ या ऑनलाइन अभियानांतर्गत राहुल गांधी यांनी सर्व देशवासीयांना उद्देशून एक ट्विट देखील केले आहे. या आपत्तीच्या काळात सर्व देशवासीयांनी एकत्र राहून एक सुरात बोलणे गरजेचे आहे. देशातील बंधू-भगिनी जिवंत राहण्यासाठी धडपडत आहेत. त्यांचा आवाज दाबला गेला आहे, अशांसाठी आवाज उठवला पाहिजे. निराश झालेले आणि भयग्रस्तांसाठी संघर्ष केला पाहिजे. आपण एकत्र आलो तर परिस्थिती बदलू शकतो, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.