इस्लामपूर – पोस्टर लावून, दुसऱ्यांवर उभे-आडवे बोलून आमदार होता येत नाही. त्यासाठी लोकांची प्रामाणिक सेवाच करावी लागते. वाळवा गाव पुराच्या संकटात अडकले होते, तेंव्हा त्या गावातील उमेदवार घरातून बाहेरही पडला नाही. आम्ही व आमच्या सहकाऱ्यांनी तिथले सगळे केले. भाजप-शिवसेनेच्या सरकारने गोरगरीब, शेतकरी, युवक, महिला, व्यापारी, नोकरदार आदी सर्व घटकांची निराशा केली असून आता संधी आहे. त्यांना सत्तेवरून पायउतार करा, असे आवाहन राजवर्धन पाटील यांनी केले.
जयंतराव पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष ऍड. चिमण डांगे, उपनगराध्यक्ष दादासो पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, युवक शहराध्यक्ष खंडेराव जाधव, पै. भगवान पाटील, प्रा. अरुणा पाटील, सुरेंद्र पाटील, ऍड. मनिषा रोटे, दलित महासंघाचे शंकर महापूरे उपस्थित होते.
राजवर्धन पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला नेते गुजरातमधील आणि त्यांच्या भाषणाचा मुद्दा काश्मिरचा. आमच्या राज्याची चेष्टा लावली आहे काय? असा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्य सर्व क्षेत्रात आघाडीवर होते. मात्र गेल्या पाच वर्षात भाजपा-शिवसेना युती शासनाने आपले राज्य रसातळाला नेले आहे.
मुंबईमध्ये सर्वात जास्त नगरसेवक, आमदार व खासदार शिवसेनेचे असताना आरे कॉलनीतील झाडे कशी तोडली? इस्लामपूर येथील सभेला आले असता, यल्लमा चौकातीलही झाड छाटलेली आहेत असे ते म्हणाले. यावेळी संजय पाटील, ऍड. धैर्यशील पाटील, जयश्री माळी, सदानंद पाटील, जयश्री पाटील, रुपाली जाधव, शंकरराव पाटील, बाळासाहेब पाटील, माणिक मोरे, अलका शहा, राष्ट्रीय खेळाडू मनिशा बाणेकर उपस्थित होते.