पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा रद्द करून तो नियमित करण्यात आला आहे. मात्र, शहरातील अनेक भागांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्यामुळे तक्रारी वाढल्या आहेत. मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत पाणीटंचाईबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहराच्या सर्व भागातील पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याचे आदेश दिले.
पवना धरण 100 टक्के भरल्यानंतर बुधवार (दि. 7) पासून शहरात सुरू असलेली पाणी कपात बंद करण्यात आली आणि पिंपरी-चिंचवडवासियांना रोज पाणी मिळू लागले. सध्या शहराच्या सर्व भागात दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ज्या दिवसापासून दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे, त्याच दिवसापासून शहरातील अनेक भागांत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या.
ऐन पावसाळ्यात आणि सणासुदीच्या महिन्यात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. पाणीटंचाईच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन आयुक्त हर्डीकर यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात बैठक घेतली. यावेळी सहशहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता रामदास तांबे, रवींद्र लडकत तसेच पाणीपुरवठा विभागातील अभियंते उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी पाणी टंचाईची कारणे अधिकाऱ्यांना विचारली. पाण्याचा साठा उपलब्ध असताना तसेच यंत्रणा असतानाही अनेक भागांत पाणीपुरवठा का होत नाही? याबाबत अधिकाऱ्यांना धारेवर धरत आढावा घेतला. पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याबाबत आदेश दिले.