वाहने एकाच जागेवर असल्याने तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता
पुणे – पूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखले जाणारे पुणे आता दुचाकींचे शहर म्हणून ओळखले जाते. दररोज रस्त्यावर उतरणारी लाखो वाहने मागच्या महिनाभरपासून सध्या जागेवर उभी आहेत. त्यामुळे अनेक वाहनमालकांना स्वत:बरोबरच आता वाहनांच्या आरोग्याची काळजी वाटत आहे. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर वाहने सुरू करताना चालकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे वाहन तंत्रज्ञ सांगतात.
शहरात सुमारे 40 लाख वाहने आहेत. त्यापैकी सध्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची केवळ काही हजार रस्त्यावर उतरत आहेत. मागच्या दोनचार दिवसांमध्ये रस्त्यावरील गाड्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तरी देखील बहुतांश जणांची वाहने आणि विशेषत: आयटीयन्सची चारचाकी वाहने मागील दोन महिन्यांपासून एका ठिकाणी उभी आहेत. त्यामुळे आता वाहने सुरू करताना कशी करावी आणि वाहने एका ठिकाणी उभी असल्याने काय होते, असा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान आणि नंतरही वाहनांची काळजी घेण्याचे आवाहन वितरकांनी केले आहे. त्यासाठी ग्राहकांशी सातत्याने संपर्कदेखील साधण्यात येत आहे.
चारचाकी वाहने एका ठिकाणी उभी असल्याने वाहनांच्या बॅटरीचा सर्वाधिक प्रश्न उद्भवू शकतो. ओपन पार्किंग किंवा मोकळ्या जागेत गाडी उभी असल्यास सध्या तापमान जास्त असल्याने टायर खराब होऊ शकतो. यासह ऑइल खराब होते, वायरिंगमध्ये त्रुटी होऊ शकतात. तर दुचाकीतील तर ऑइल खराब होऊ शकते. काहीवेळा बॅटरी “डिस्चार्ज’ होते, असे वाहन तंत्रज्ञ सांगतात. काही गाड्यांमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो. गाडी जागेवरच सुरू केली पाहिजे. याशिवाय लॉकडाऊननंतर गाडीच्या स्थितीची प्राथमिक तपासणी करून, गरज असल्यास सर्व्हिसिंग करून घेणे आवश्यक आहे, असे गुरुदत्त ऑटोमोबाइलचे सचिन सोमवंशी यांनी सांगितले.