जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिक्रापूर- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे झालेल्या आंदोलनावेळी तत्कालीन राज्य सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केले होते. ते गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कार शेडसाठी हजारो वृक्ष एका रात्रीत कापण्यात आले होते. यावेळी प्रशासनाने एका रात्रीत हे कृत्य केल्यानंतर अनेक पर्यावरणप्रेमींकडून आंदोलन केले होते. त्यावेळी वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या वृक्षप्रेमींवर गुन्हे दाखल केले होते. आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरेतील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करीत कोरेगाव भीमा येथील आंदोलनातील खोटे गुन्हे मागे घेण्याची विनंती केली आहे. शनिवारी आणि रविवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन झाले.
यावेळी सभागृहात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आरेमधील आंदोलना दरम्यान अनेक तरुण मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पालकांना याची चिंता आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी आमदार आव्हाड यांनी केली. या मागणीला प्रतिसाद देत मुख्यमंत्री ठाकरेंनी संध्याकाळी गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले.