नवी दिल्ली – भारतीय बॅडमिंटनची कक्षा रुंदावत आहे, पण त्यात चांगली प्रगती व्हावी असे वाटत असेल तर त्याच दर्जाचे प्रशिक्षक पाहिजेत. सध्या आपल्याकडे जे प्रशिक्षक आहेत ते प्रशिक्षणाबाबत गांभीर्य दाखविण्याऐवजी प्रशासनात रस घेतात. आपले काम काय आणि आपण करतो काय हे समजले पाहिजे, अशा शब्दात भारताचा माजी ऑल इंग्लंड विजेता खेळाडू व प्रशिक्षक पुलेला गोपीचंद याने प्रशिक्षकांना टोला लगावला आहे.
सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांच्यासारखे अनेक प्रतिभावान खेळाडू देशात आहेत. ते पुढेही येतील मात्र, त्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक त्याच दर्जाचे हवेत. सध्या प्रशिक्षकांचे काम पाहिले तर लक्षात येते की, ते खेळाडूंना मार्गदर्शन करण्यापेक्षा प्रशासकीय कामकाजातच जास्त रस घेतात. देशातील विविध राज्यांच्या संघटनांनी आपल्या प्रशिक्षकांना प्रत्येक निर्णय घेण्याचा अधिकार दिला पाहिजे. त्यांना प्रत्येक गोष्टीची परवानगी घेण्यासाठी संघटनेच्या पदाधिकारी व्यक्तींकडे विनंती करावी लागते, त्याचा पाठपुरावा करावा लागतो. हे चित्र बदलले पाहिजे, असेही गोपीचंद यांनी व्यक्त केले.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) आयोजित ऑनलाइन चर्चेत सहभागी होत त्यांनी आपली मते अत्यंत परखडपणे मांडली.
देशाच्या बॅडमिंटनचा दर्जा आता आहे त्यापेक्षा जास्त उंचावण्याची गरज आहे. त्यासाठी परदेशी खेळाडूंच्या खेळाचे निरीक्षण करून त्याचा अभ्यास करून, त्यांचे कमकुवत दुवे हेरून आपल्या खेळाडूंना त्याबाबत प्रत्यक्ष कोर्टवर उतरून मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक पाहिजेत.
सध्याचे काही प्रशिक्षक महिन्यातील काही दिवस प्रशिक्षण देण्यासाठी कोर्टवर येतात. मात्र, त्यांना संघटनेच्या कामकाजात लक्ष देण्यातच धन्यता वाटते. आपली नियुक्ती कशासाठी झाली आहे, आपले मूळ काम काय आहे याची जाणीव यायला हवी. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू कुठे चुकतात, त्यांना याबाबत कसे अवगत करायचे याकडे प्रशिक्षकांनी लक्ष दिले पाहिजे, असेही गोपीचंद यांनी स्पष्ट केले.
सायना, सिंधूकडून प्रेरणा घ्या…
भारतीय बॅडमिंटनचा इतिहास पाहिला तर सायना नेहवाल व पी. व्ही. सिंधू यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आज यश मिळवले आहे. त्यांनी खेळावर ज्या पद्धतीने लक्ष केंद्रित केले त्याचे जास्त कौतुक वाटते. काहीवेळा त्यांना अपेक्षेप्रमाणे खेळ करता नाही आला मात्र, त्यांनी हार मानली नाही उलट जास्त मेहनत करून यश खेचून आणले. ज्यांना या खेळात कारकीर्द घडवायची असेल त्यांनी या दोघींकडून प्रेरणा घेतली पाहिजे. मला देखील या दोघींकडून पुढील वर्षी होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची आशा आहे, पण ते पदक चांदीचे नव्हे तर सोन्याचे पाहिजे. असेही गोपीचंद यांनी म्हटले आहे.
सांघिक प्रायोजकांची गरज….
क्रीडा क्षेत्राला पूर्वी प्रायोजक मिळत नव्हते तेव्हा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाणही जास्त नव्हते. सायना व सिंधू यांच्या यशाने तसेच बॅडमिंटनच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आता प्रायोजक पुढे येतात ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे प्रायोजक एखाद्या खेळाडूला मदत करतात. अशी वैयक्तिक मदत करण्यापेक्षा सांघिक मदतीची आज खरी गरज आहे, अशी अपेक्षाही गोपीचंद यांनी व्यक्त केली.