पंढरपूर : आम्ही नियम मोडण्यासाठीच इथे आलोय. मंदिरं खुली करण्यासाठी ही गर्दी झाली आहे. मंदिरे खुली करावी या लोकांच्या भावना आहेत. लोकं एकत्रित जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही, हे आम्हाला सरकारला दाखवायचं आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. कोणतीही कारवाई करा आम्ही आंदोलन करणारच, असे आंबेडकर यावेळी म्हणाले. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. आता त्यांची वाट पाहात आहे. त्यांचा निरोप काय येतो ते पाहू, त्यानंतर मी विठ्ठल मंदिरात जाणार आहे, असे आंबेडकरांनी यावेळी म्हटले.
विठ्ठल मंदिर परिसरात वंचितच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाले, यावर विचारले असता प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आम्ही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, मात्र कार्यकर्ते ऐकायला तयार नाहीत, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, मागच्या वर्षी जितकी लोकं पंढरपुरात मृत्यूमुखी पडली त्यापेक्षा कमी लोकं यंदा मृत झाली आहेत, त्यामुळे कोरोनाची भीती दाखवू नका, असेही त्यांनी सूचित केले.
यावेळी आंबेडकर यांनी एकमेकांमध्ये अंतर ठेवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. बॅरिकेट्स तोडू नका. प्रशासनाला सहकार्य करा, एकमेकांना चिटकून उभे राहू नका, असे आंबेडकर म्हणाले. यावेळी वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडण्याचा प्रयत्न केला. मंदिरे खुली करण्यासाठी आज विश्व वारकरी सेवा आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी पंढरपुरात आंदोलन केले. वंचितच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडले. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरला आले. त्यांच्यासोबत चार गाड्यांचा ताफा असून त्यात कार्यकर्ते आहेत.