नानगन (तैवान) – गेल्या आठवड्यात तैवानमधील इंटरनेट सेवा विस्कळीत झाली होती. इंटरनेटच्या आधारे चालणारी इलेक्ट्रॉनिक माध्यमांची सेवा विस्कळीत झाली होती. चीनच्या शेजारी असलेल्या मात्सू बेटावरील लोकांना वीजेचे बिल भरणे, डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट घेणे आणि पॅकेज स्विकारण्यासारखे आपले दैनंदिन इलेक्ट्रॉनिक व्यवहार देखील करता येत नव्हते.
बाह्य जगाशी जोडले राहण्यासाठी मात्सू बेटावरील 14 हजार लोकांना समुद्रातून गेलेल्या इंटरनेट केबलवर अवलंबून रहावे लागते. ही केबल तैवानच्या मुख्य भूमीशी जोडलेली आहे. तेथूनच मात्सू बेटाला इंटरनेट उपलब्ध करून दिले जाते. मात्र ही केबल चीनच्या जहाजांनी तोडून टाकल्याचा आरोप आता केला जातो आहे.
समुद्रातून 50 किलोमीटर लांबपर्यंत टाकलेली ही केबल पहिल्यांदा चीनच्या मासेमारी नौकांमुळे तुटल्याचा संशय आहे. त्याच्या 6 दिवसांनंतर 8 फेब्रुवारीला चीनच्या मालवाहू जहाजामुळे दुसऱ्यांदा ही केबल तुटली, असा दावा तैवानच्या “नॅशनल कम्युनिकेशन कमिशन’ने केला आहे.
दरम्यानच्या काळात मात्सू बेटावरील लोकांना इंटरनेट उपलब्ध करून देण्यासाठी तैवानने मायक्रोवेव्ह रेडिओ ट्रान्समिशनच्या माध्यमातून मर्यादित क्षमतेचे इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र या इंटरनेटची क्षमता इतकी क्षीण आहे की यामुळे साधा टेक्स्ट मेसेज सेंड होण्यास काही तास लागतात. ऑडिओ कॉल ड्रॉप होतात आणि व्हिडीओ तर डाऊनलोड होऊन बघताही येत नाहीत. इंटरनेट नसल्यामुळे पर्यटकांनी आपला प्रवास रद्द करायला सुरुवात केली आहे. आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी तज्ज्ञांकडून पर्यायी व्यवस्था शोधली जाते आहे.
तैवानला त्रास देण्याच्या उद्देशाने चीनने जाणीवपूर्वक इंटरनेट केबल तोडून टाकली असावी, असा काही तज्ज्ञांचाही अंदाज आहे. चीनच्या जहाजांनी मुद्दाम ही केबल तोडून टाकल्याचा आरोप तैवानच्या सरकारने केलेला नाही. कारण केबल तुटण्यास चीन जबाबदार असल्याचे ठोस पुरावे तैवानच्या सरकारकडे नाहीत.