पुरंदर उपसाच्या पाण्याने शेतकरी समृद्ध
दिवे (वार्ताहर) - येथील कोल्हे-पाटील वस्तीमध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी आल्याने शेतकरी वर्गाने आनंद व्यक्त केला. मागील वर्षी स्व. सदाशिवआण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट व दिवे परिसरातील अधिकारी वर्ग व शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुरंदर उपसा पंपहाऊस ते कोल्हे वस्ती अशी पाइपलाइन करण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचे पाणी पूर्ण दाबाने मिळू लागले. त्यामुळे परिसरातील बंधारे भरणे सोपे झाले आणि या पाण्यामुळे आता अंजीर, सीताफळ बागांना जीवदान मिळाले आहे. महिला शेतकऱ्यांनी पाण्याचे पूजन केले. यावेळी ज्ञानेश्वर झेंडे, उत्तमआबा झेंडे, राजेंद्र झेंडे, नानासो झेंडे, रामदास गायकवाड, मुरलीधर झेंडे, ताराचंद झेंडे, तात्या जगताप, सिंधुताई झेंडे, सारिका झेंडे, मीना झेंडे, सुजाता झेंडे, अर्चना झेंडे, सुभद्रा झेंडे आदी उपस्थित होते.