आठ महिन्यांत 88 जणांवर तडीपार कायद्यानुसार कारवाई
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्या आठ महिन्यांमध्ये 25 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी तडीपार केले आहे. मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करीत शहरात येऊन दहशत निर्माण करणाऱ्या 88 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने तडीपारिनंतरही गुंडांचा शहरात वावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
दहशतीसाठी मारामाऱ्या करणे, धमक्या देणे, खंडणी वसूल करणे, दंगल माजविण्याचा प्रयत्न करणे किंवा दंगल माजविण्यासाठी चेतावणी देणे अशा गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या सराईतांना तडीपार केले जाते. काही वर्षांपूर्वी तडीपार या शब्दाची दहशत समाजात होती. तडीपार गुंडांना आपल्यापासून चार हात लांब ठेवण्याचा प्रयत्न समाजाकडून होत होता.
तडीपार केलेल्या व्यक्तीला शहरात येण्यासाठी मोठा प्रवास करावा लागत असे. आता मात्र दळणवळणाची साधने मुबलक प्रमाणात असल्याने दहा जिल्हे पार करून तडीपार गुंड रातोरात शहरात येऊन गुन्हे आणि दशहत निर्माण करीत आहेत. परिणामी, या कायद्याचा आता फायदा होताना दिसत नाही. तडीपार कारवाईची धार कमी झाल्याची कबुली पोलीस अधिकारी देत आहेत.
तडीपारांना कायद्याची भिती नाही
तडीपारीचा भंग करून शहरात आलेल्या गुंडांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अनुसार गुन्हा दाखल करून त्यास न्यायालयात हजर करण्यात येते. नातेवाईकांचे आजारपण किंवा इतर काहीतरी स्पष्टीकरण दिल्यानंतर संबंधितांना न्यायालय पुन्हा तडीपार केलेल्या ठिकाणी पाठवते. अनेक वर्षांपासून हेच चित्र पिंपरी चिंचवड शहरात दिसून येते. त्यांच्यावर वचक बसेल अशी कारवाई होताना दिसत नाही. यामुळे तडीपार गुंडांमध्ये पोलीस कारवाईची भिती राहिलेली नाही. त्यामुळे तडीपारीच्या कायद्यात बदल करण्यात आवश्यकता निर्माण झाली आहे.
आणि तो पुन्हा आलाच नाही
काळाखडक, वाकड येथील सराईत गुन्हेगार विशाल कसबे हा तडीपारीच्या आदेशाचा भंग करून शहरात आला होता. तसेच त्याने एक गुन्हाही केला. यामुळे वाकड पोलिसांनी त्यास अटक केली. त्याची दहशत असलेल्या परिसरातून त्याची तपासाच्या नावाखाली धिंड काढली. आपल्याच परिसरात झालेल्या अपमानामुळे तो पुन्हा तडीपारीच्या आदेशाचा भंग करून परिसरात आलाच नाही. त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय पोलिसांनी घ्यायला हवा, अशी चर्चाही सर्वसामान्यांमध्ये रंगली आहे.