नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेल्या तबलिगी जमातच्या सदस्यांना त्यांच्या राज्यांत पाठवले जाणार आहे. मात्र, चौकशीच्या घेऱ्यात असणाऱ्या काही तबलिगींची रवानगी दिल्ली पोलिसांच्या कोठडीत होणार आहे.
दिल्लीतील विलगीकरण केंद्रांमध्ये सुमारे 4 हजार तबलिगींना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या विलगीकरणाचा कालावधी आता पूर्ण झाला आहे. त्यातील 900 जण दिल्लीचेच रहिवासी आहेत. तर उर्वरित इतर राज्यांमधील आहेत. त्यात तामीळनाडू आणि तेलंगणमधील रहिवाशांची संख्या अधिक आहे.
विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याने तबलिगी सदस्यांना घरी जाऊ देण्याचा आदेश बुधवारी दिल्लीतील आप सरकारने जारी केला. अर्थात, चौकशीसाठी हवे असणाऱ्या तबलिगींना दिल्ली पोलिसांकडे सोपवण्याचे सूतोवाचही त्या आदेशातून करण्यात आले.
दिल्लीत मार्चमध्ये तबलिगी जमातचा मेळावा झाला. त्या मेळाव्याला हजर राहिलेल्या अनेक तबलिगींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तो मेळावा वादग्रस्त ठरला. त्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे काही तबलिगी सदस्य पोलिसांच्या रडारवर आहेत.