दुबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सराव सामना सुरू होण्यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांच्यात मोठा वाद झाल्याचे सांगितले जात आहे. या सामन्यासाठी कोहलीला विश्रांती देण्यात येऊन रोहितकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते.
या सामन्यात या दोघांमध्ये झालेले वाद हे नेतृत्वावरून सुरू असलेले शीतयुद्ध असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कोहलीच्या आक्रमक स्वभावामुळेच हे वाद वारंवार होत असल्याचे काही खेळाडूंनी बीसीसीआयला सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना सुरू झाल्यापासून रोहित आणि विराट यांच्यांतील शीतयुद्ध मैदानातही अनुभवायला मिळाले. या सामन्याच्या नाणेफेकीच्यावेळी रोहितने कोहलीला विश्रांती दिल्याचे सांगितले होते. मात्र, जेव्हा भारतीय संघ मैदानात उतरला तेव्हा रोहितसह कोहलीही मैदानात उतरला. कर्णधार पहिल्यांदा मैदानात उतरतो पण या सामन्यात कोहलीला मैदानात पहिल्यांदा उतरता आले नाही, त्यामुळेही या दोघांमध्ये वाद झाल्याचे म्हटले जात आहे.
त्याचबरोबर या सामन्यात रोहित कर्णधार असला तरीही कोहलीच काही निर्णय घेताना दिसला. रोहित कर्णधार असतानाही या सामन्यात कोहलीच गोलंदाजांशी चर्चा करत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रोहितला आजच्या सामन्यात फक्त नावालाच कर्णधार केले होते आणि सर्व अधिकार कोहलीकडेच देण्यात आले होते का, असा प्रश्न चाहते विचारत आहे.