दुबई – सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने केलेल्या झंझावाती फलंदाजीनंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर भारतानं अफगाणिस्तानचा ६६ धावांनी पराभव करत विजय साकारला. टी-20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा हा पहिला विजय ठरला.
गोलंदाजीत भारताकडून मोहम्मद शम्मीने ४ षटकांमध्ये ३२ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्याच्यापाठोपाठ आर. अश्विनने 4 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले. बुमराह आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, अफगाणिस्तानचा कप्तान मोहम्मद नबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि केए राहुल यांची अर्धशतके, तर हार्दिक पंड्या-ऋषभ पंत यांनी काढलेल्या झटपट धावांमुळे भारताने 20 षटकांत 2 गडी गमावत अफगाणिस्तानसमोर 211 धावांचे आव्हान ठेवले.
भारताकडून रोहित शर्माने 47 चेंडूत सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलने 48 चेंडूत 69 धावांची खेळी खेळली. शेवटी ऋषभ पंतने केवळ 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 धावांची स्फोटक खेळी केली.
अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत करीम जनत आणि गुलाबदीन नाईब यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.