मेलबर्न : गोलांदाजीत राधा यादवने केलेल्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजीत शफाली वर्माने केलेल्या तडाखेबाज फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने महिला टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत चौथ्या व अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा ७ विकेटनी पराभव करत सलग चौथा विजय नोंदविला. यापूर्वीचे अ गटातील तिन्ही सामने जिंकत अगोदरच भारताने उपांत्य फेरी गाठली आहे. राधा यादव सामन्याची मानकरी ठरली.
https://twitter.com/T20WorldCup/status/1233644823829254145?s=19
श्रीलंकेने विजयासाठी दिलेले ११४ धावांचे आव्हान भारतीय संघाने १४.४ षटकात ३ बाद ११६ धावा करत पूर्ण केले. भारताकडून शफाली वर्माने सर्वाधिक ४७(३४), स्मृति मंधानाने १७(१२), हरमनप्रीत कौरने १५(१४), जेमिमा राॅड्रिग्जने नाबाद १५(१५) आणि दिप्ति शर्माने नाबाद १५(१३) धावांची खेळी करत विजय साकारला.
श्रीलंकेकडून गोलंदाजीत ऊडेशिका प्रबोधनी आणि शशीकला सिरिवर्देने यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. तर, हंसिमा करूनारत्ने हिने शफाली वर्मा हिला धावबाद केले.
तत्पूर्वी, श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने चमारी अटापटटुच्या ३३(२४), शशीकला सिरिवर्देनेच्या १३(१२),हर्षिता मादवीच्या १२(१७) आणि कविषा दिलहारीच्या नाबाद २५(१६) धावांच्या खेळीच्या जोरावर २० षटकांत ९ बाद ११३ धावा केल्या होत्या.
भारतीय संघाकडून गोलंदाजीत राधा यादवने ४ षटकात २३ धावा देत सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. राजेश्वरी गायकवाडने २ तर दिप्ती शर्मा, शिखा पांडे आणि पूनम यादवने प्रत्येकी १ विकेट घेतली.