नवी दिल्ली – क्रिकेटच्या जगात टी-20 विश्वचषक ही संकल्पना 2007 सालापासून सुरू झाली आणि पाहिल्याच स्पर्धेत भारताने क्रिकेटमधील आपली ताकद दाखवली. स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत पहिला टी-20 विश्वचषक आपल्या नावावर केला होता. तेव्हापासून आजपर्यंत भारताने टी-20 क्रिकेटमध्ये खूप मोठ यश मिळवलेले आहे. 2007 सालच्या टी-20 विश्वचषक फायनलमधील असाच एक किस्सा भारताचा माजी वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माने सांगितला आहे.
दक्षिण आफ्रिकेतील जोहानसबर्ग येथे 24 सप्टेंबर 2007 ला पहिल्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली. याच स्पर्धेच्या फायनल सामन्यात प्रतिस्पर्धी होते भारत आणि पाकिस्तान. क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की, मैदानातील प्रेक्षकांची गर्दी पाहण्यासारखी असते. फायनलच्या सामन्यात भारताने पाकिस्तानला 158 धावांचे लक्ष्य दिले होते.
या धावसंख्येचा बचाव भारतीय संघ अत्यंत सावधगिरीने करत होता. त्यामुळे पाकिस्तानला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. अशा वेळी तेव्हा कर्णधार असलेल्या एमएस धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात चेंडू दिला. जोगिंदरने आत्मविश्वासाने गोलंदाजी करत शेवटच्या षटकात मिसबाह-उल-हक याला बाद केले आणि भारताने फायनलचा सामना जिंकला होता.
जोगिंदर सांगतो की, ‘शेवटचे षटक टाकण्यापूर्वी मी कोणत्या लाईन-लेंथने गोलंदाजी करावी याबाबत माहीने कोणतीही चर्चा केली नाही. त्याने फक्त एव्हढेच सांगितले की, कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नकोस, आपण हरलो तर ती संपूर्ण जबाबदारी माझी असेल. त्यामुळे माहीच्या या शब्दांनी माझा आत्मविश्वास उंचावला होता. शेवटच्या षटकात गोलंदाजी करणे आणि ते देखील पाकिस्तान विरुध्द फायनल सामन्यात ही गोष्ट जरा आव्हानात्मकच होती. या षटकात गोलंदाजी करताना मी फलंदाजाच्या बाजूने विचार केला आणि त्या पध्दतीने गोलंदाजी केली. त्यामुळे मिसबाहला बाद करण्यात यश आले आणि आम्ही सामना जिंकलो.’