भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर सामना खेळला गेला. सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ७१ धावांनी सहज पराभव केला. या विजयासह भारताने गट-ब च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. त्यामुळे आता सेमीफायनलमध्ये गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी भारताची इंग्लंडशी लढतहोणार आहे. त्याअगोदर ९ नोव्हेंबरला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळला जाईल. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) २५ चेंडूत नाबाद ६१ धावांची धडाकेबाज खेळी केली.
#INDvsZIM । भारताचा झिम्बाब्वेवर ७१ धावांनी विजय; सेमीफायनलमध्ये टीम इंडिया इंग्लंडशी भिडणार
सूर्यकुमारला ( Suryakumar Yadav ) सामन्यातील त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमार म्हणाला की, “माझी योजना अगदी स्पष्ट होती की आपल्याला जास्त धावा काढायच्या आहेत. हार्दिक आणि मी एकदा मोठे फटके मारायला सुरुवात केली तेव्हा आम्ही थांबलो नाही. माझी योजना अगदी स्पष्ट होती, कारण मला काय आणि कसे करायचे हे माहित होते. संघासाठी अशी कामगिरी केल्यानंतर समाधान वाटते. मी नेहमीच असा विचार करतो की, प्रत्येक सामन्यात मला शून्यातून सुरुवात करावी लागेल.”
सामना संपल्यानंतर सूर्यकुमारने ( Suryakumar Yadav ) स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधला. यावेळी त्याला ३६० डिग्री क्रिकेटिंग शॉट्स खेळण्याबद्दल विचारले असता सूर्या म्हणाला की, “जगात ३६० डिग्रीत फलंदाजी करू शकणारा एकच खेळाडू असून तो एबी डिव्हिलियर्स आहे. मी फक्त त्याप्रकारे खेळण्याचा प्रयत्न करत आहे. मी नेहमीच मैदानानुसार खेळण्याचा विचार करतो. त्यामध्ये कधी मी यशस्वी होतो, कधी अयशस्वीही होतो.”
सूर्यकुमार ( Suryakumar Yadav ) पुढे म्हणाला की, “स्पर्धेच्या अगोदर १० दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात आल्याचा खूप फायदा झाला आहे. सुरुवातीला आम्ही काही सामने खेळल्यामुळे आम्हाला येथील खेळपट्ट्या समजून घेण्याची संधी मिळाली. स्पर्धेला इथे येण्यापूर्वी मी वानखेडेवर अधिकाधिक सराव करायचो, तिथूनच ऑस्ट्रेलियासारख्या उसळत्या खेळपट्टीवर खेळण्याचा योग्य मार्ग मिळाला.”