T20 World Cup 2021: विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले तेव्हा या स्पर्धेचा सर्वात मोठा दावेदार टीम इंडिया होती. विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह यांसारख्या दिग्गजांनी भरलेला संघ प्रत्येक प्रतिस्पर्ध्यासाठी मोठा धोका होता. पण भारतीय संघाने T20 विश्वचषकात अत्यंत खराब कामगिरी केली आणि हा संघ सुपर-12 फेरीतूनच बाहेर पडला.
अफगाणिस्तानवर न्यूझीलंडच्या विजयासह, टी -20 विश्वचषक 2021 च्या उपांत्य फेरीत पोहोचणारा संघ निश्चित झाले ज्यामध्ये भारताचे नाव नाही. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांनी उपांत्य फेरीत धडक मारली असून 2007 मध्ये टी-20 चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा मार्ग बंद झाला आहे.
या स्पर्धेत टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली होती. पहिल्या सामन्यातच भारतीय संघ पाकिस्तानकडून 10 विकेटने हरला होता. यानंतर न्यूझीलंडनेही टीम इंडियाला एकतर्फी 8 गडी राखून पराभूत केले. हे दोन पराभव टीम इंडियासाठी मोठा झटका ठरले आणि पुढचे दोन सामने जिंकूनही निराशाच झाली. या स्पर्धेत बलाढ्य टीम इंडियाने अशा कोणत्या चुका केल्या, ज्यांमुळे त्याचा मार्ग चुकला. हे जाणून घेऊया…
– टीम इंडियाच्या अपयशाचे पहिले मोठे कारण
इंग्लंडविरुद्धच्या होम ग्राउंडवरील मालिकेपर्यंत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन अप्रतिम दिसत होती. पण आयपीएल 2021 च्या अखेरीस सर्वकाही बदलले. हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा समतोल बिघडला. टीमने त्याला स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संधी दिली आणि पाकिस्तानविरुद्ध टीम इंडिया केवळ 5 गोलंदाजांसह मैदानात उतरली. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला एकही विकेट घेता आली नाही आणि पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघ अचानक खूपच कमकुवत दिसू लागला.
– टीम इंडियाच्या अपयशाचे दुसरे मोठे कारण
रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांसारख्या फलंदाजांनी सुसज्ज असलेल्या टीम इंडियाने सराव सामन्यांमध्ये अप्रतिम फलंदाजी केली, पण लीग टप्पा सुरू होताच सगळे फ्लॉप झाले. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताची टीम फ्लाॅप झाली. इतकंच नाही तर पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघ इतका घाबरला की, रोहित शर्माला सलामीऐवजी तिसऱ्या क्रमांकावर उतरवलं. दुबईच्या खेळपट्टीवर फलंदाजांनी पुरेशा धावा केल्या नाहीत की, गोलंदाजांना त्यासाठी झगडता येईल.
– टीम इंडियाच्या अपयशाचे तिसरे मोठे कारण
भारतीय संघाच्या अपयशाचे तिसरे सर्वात मोठे कारण म्हणजे गोलंदाजांची चुकीची निवड. टीम इंडिया एकेकाळी युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या दोन फिरकीपटूंसोबत मैदानात उतरत असे, पण या संपूर्ण स्पर्धेत विराट आणि कंपनीने रिस्ट स्पिनरला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवले नाही. प्रथम, युझवेंद्र चहलच्या अनुभवावर राहुल चहरला प्राधान्य देण्यात आले आणि त्यानंतर या गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्येच संधी देण्यात आली नाही. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांच्या मधल्या षटकांमध्ये टीम इंडियाला विकेटही काढता आल्या नाहीत.
-टीम इंडियाच्या अपयशाचे चौथे मोठे कारण
नाणेफेक हेही टीम इंडियाच्या पराभवाचे चौथे प्रमुख कारण होते. दुबईतील दिवस-रात्रीच्या सामन्यांमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा करण्यात नेहमीच अडचणी येत होत्या आणि पहिल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक गमावली होती. रात्री पडणाऱ्या दवामुळे पाकिस्तानने 152 धावांचे लक्ष्य सहज गाठले आणि न्यूझीलंडनेही 111 धावा आरामात केल्या.
-टीम इंडियाच्या अपयशाचे पाचवे मोठे कारण
बायो-बबल थकवा हे देखील टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळल्यानंतर लगेचच यूएईला पोहोचले आणि आयपीएल 2021 खेळायला सुरुवात केली. आयपीएल 2021 नंतर लगेचच टी20 विश्वचषक 2021 सुरू झाला. बायो-बबल थकवा आणि जास्त क्रिकेट खेळाडूंना कठिण ठरले आहे आणि त्याचा उल्लेख स्वतः कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाने केला आहे.